गुरुवार, ८ डिसेंबर, २०११

गावाकडच्या आठवणी



     
      माझा जन्म तसा खेडे गावातलाच. जन्म कुठला यापेक्षा माझं सारं बालपण तिथलंच.... मुक्काम पोस्ट पिंपोडे बुद्रुक, जिल्हा सातारा. आमचं गाव म्हणजे वाईकडून पूर्वेकडे आलं आणि पुणे-बंगलोर हमरस्ता ओलांडला कि तसंच सरळ पूर्वेकडला एक घाट चढून  १०-१२ मैलावर विसावलेलं. घाटमाथ्यावरूनच उताराला असलेल्या ४-५ गावांच्या टोळक्यात आमचं गाव जरा उठूनच दिसतं. १०-१५,००० लोकवस्तीचं असेल गाव आमचं.  आस-पासच्या नाही म्हणालं तरी एक ७-८ वाड्या-वस्त्या आमच्या गावच्या बाजारपेठेवर अवलंबून असलेल्या.  गावात तलाठी - ग्राम-पंचायत कार्यालय, रयत शिक्षण संस्थेची माध्यमिक शाळाएक प्राथमिक शाळा, सरकारी इस्पितळ,  छोटी-मोठी ७-८ हॉटेलं, ४-५ छान-छान देवळं आणि एका खेड्याला साजेसं  असं चंद्रभागेच्या  वळणावानी  STस्टँड.  गावच्या पश्चिमेला कधीतरी ओल पांघरून  वाहणारी आमची 'वसना' नदी. कधीतरी म्हणजे आमचा गणपती बाप्पा जाइतोपर्यन्त पाणी राहिलं नदीला तरी आम्ही नशीबवान असायचो.  

     तर... चौथी-पाचवीला असताना एकदा आमचं ग्यांगवार दिवाळीच्या सुट्टीमध्ये नदीला गेलेलं भरकटायला. आमच्या ग्यांगमध्ये मी, सच्या, बंड्या, इक्र्या, चैत्या, लाल्या, संत्या, बाळ्या, रेवण्या, खालच्या आळीचा संत्या, राज्या अशी सगळी २-४ वर्षे खाली-वर असणारी पोरं. तसं ठरवून गेलो नव्हतो बर का!  त्याचं झालं असं किएकदा 'विटी-दांडूखेळताना  इक्र्यावर आलं राज्य. इक्र्या (विक्रम) म्हणजे त्यावेळी प्रत्येक खेळामध्ये गिऱ्हायिक बनणारा आमचा एक रडका बाल-मित्र. डावातल्या  इतर  पोरांनी आबक-दुबक-तीबक करत करत त्याला नदी-पर्यंत न्यायचं ठरवलं. आणि नदी जवळ येईल तसा इक्र्या रडकुंडीला येऊ लागला. कारण त्याला तिथून आम्ही लंगडी घालत पुन्हा आणणार होतो, तेही फक्त २-३ च ठेवे देऊन.  हे त्याचं नेहमीचंच नाटक होतं. शेवटी जसं आम्ही नदीकडेला पोहोचलो तसं खेळ सोडून सगळेजण इकडे-तिकडे पांगू लागले. कोणी पाण्यात दिसणारा इरुळा शोधायला लागलं, कोणी काटक्या घेऊन खडकाखालच्या  खेकड्यांना डिवचायला लागलं, कोणी इक्र्याला पकडून पाण्यात बुडवू लागलं, कोणी नदीकडेच्या बोरीची बोरं  पाडायला लागलं, आणि मी आणि सच्या.... (सचिन) माझा जवळचा बाल-मित्र.... आम्ही गेलो चिंचेला. २०-२५ लहान-मोठी दगडं गोळा केली आणि चिंचेचा गड्डा दिसेल तिकडे एकावर एक भिरकाऊ लागलो. एखाद-दुसरं बुटुक खाली पडायचं,  तेही च्या-मायला   नदीच्या पाण्याच्या डोहात जाऊन. चिंचा अजून तशा हिरव्यागार होत्या. मधून अधून एखादी पडली कि ज्याला सापडेल तो आधीच ओरडायचा, "ऑर्बिट नो अय बरका"!!! 'ऑर्बिट-होआणि 'ऑर्बिट-नो' हे शब्द म्हणजे, समजा आपल्या हातात एखादी खाऊची गोष्ट असेल आणि ती आपल्याला मित्रांना द्यायची नसेल तर मित्र समोर दिसल्या दिसल्या बोलायचं 'ऑर्बिट नो'. मग कोणी ती मागायची नाही अन आपणही ती कोणाला द्यायची नाही. आणि खपवायचीच  असेल तर 'ऑर्बिट हो' म्हणून रिकामं ह्वायचं आणि मग वाटायची सगळ्यांना. पण शेवटी-शेवटी एखादी पडलेली चिंच मग आम्ही दोघांनीही तोडून खाल्ली अर्धी-अर्धी.... हे सगळे प्रयोग चालू असताना मधेच संत्या बोम्बलला,  "आयो sss आयो चावला आयघाला". आम्ही सगळे तिकडे पळालो. तर हा बहाद्दर खेकडे पकडत होता. आणि एक मोठा खेकडा खडकाखाली पळाल्यावर ह्यानबी  त्या मोठ्या दगडाखाली हात घातलेला त्याला पकडायला. मग काय? चावला कच्चकन ह्याच्या हाताला! तसा खेकडे पकडायला तो तरबेज होता.  खेकडेच काय! मव्हात डायरेक्ट हात घालून पोळं काढणारा हा 'संत्या' नावाचा प्राणी.... आमच्यात फार बनील. तसा आमच्या टोळक्यात सगळ्यात मोठ्ठाच होता तो.  पण आवसं-पुनवंला शाळंला जाऊन, मागच्या बाकावर बसून, अंगाने वाढलेला हा आडदांड बुद्धीचा प्राणी....  शिव्या  देऊ  लागला त्या  खेकड्याला.   नाय म्हणाला, आज ह्या खेकड्यांना सोडणार नाय. त्याच्या जोडीला कायम असायचा 'बाळ्या'. ते भी तसलंच ध्यान.  दोघांनी पुढचा प्लान ठरवून टाकला. उद्या  संध्याकाळी ७ वाजता सगळ्यांनी खेकडे पकडायला पुन्हा नदीला यायचं. तेही अगदी तयारीनिशी.   कारण काय? तर अंधाराच्या वेळी खेकडे बाहेर येतात आणि लगेच सापडतात.  झालं, आमचा डाव ठरला. असलं काय पोरांनी ठरवलं कि आमच्या डोक्यात पहिला प्रश्न म्हणजे आता घरी काय सांगायचं?  घरी सांगितलं असलं काही कारण तर आई लाटण्याने बडवून काढेल आणि आप्पांचा तर एकाच झपाटा मला चड्डी ओली करायला बास असायचा.  पण पोरांनी ठरवलेल्या एखाद्या प्लानला नेहमीच नकारघंटा लावणाऱ्यातला  मी नव्हतो.  बघू म्हटलं, उद्याचं उद्या.  पण रात्रीच्या वेळी नदीवर म्हणजे एक वेगळा अनुभव असणार हे कुतूहल मात्र मनात होतं.  हे विचार मनात रेंगाळत होते तोच 'बाळ्या'ने एक खेकडा हातात पकडला आणि त्याची वळवळणारी नांगी आम्हाला दाखऊ लागला. सगळ्यांनी पाहू लागल्यावर ती नांगी कशी तोडायची हे त्याने 'ती' तोडून आम्हाला शिकवले. एकदा नांगी तोडल्यावर खेकडा पकडायला किती सोपा असतो हेही त्याने शिकवले. दुसऱ्या एकाने  तो प्रयोग एका खेकड्यावर करून पहिला. आणि त्याचीही भीती गेली. झालं मग, उध्याचा प्लान फायनल झाला. कोणी-कोणी काय काय आणायचं ते ठरवत आम्ही त्या खडकावरून उठलो.  टिवल्या भावल्या करत, इकडच्या तिकडच्या गोष्टी करत आम्ही पुन्हा घरचा रस्ता धरला. दुपार होऊन गेली होती. आणि भूकही खूप लागलेली आता. मग सगळे 'चला आता जाऊ घरी' म्हणत निघालो. निघताना लक्षात आलं कि, 'इक्र्या' कधीच आमच्यातून सटकला होता.

 
       झालं, दुसरा दिवस उजाडला. टंगळ-मंगळ करत दिवस घालवला, कारण सुट्ट्याच सुरु होत्या दिवाळीच्या. संध्याकाळी नेहमीसारखं आम्ही सगळे ६ वाजता खेळायला जमायचोच, आजही सगळे आलेले. मग तिन्हीसांजेला थोडा अंधार पडू लागल्यावर आमची नदीला जाण्याची तयारी सुरु झाली. ठरल्याप्रमाणे प्रत्येकजण  आपापली ठरलेली वस्तू आणायला गेला. 'इकास'(विकास)  बादली घेऊन आला. 'बंड्या'ने, खेकडे चाऊन घेण्याची  रिस्क नको म्हणून एक मोठा चिमटा घेतला. 'संत्या'ने सायकलच्या दुकानातून  २-४ टायरी घेतल्या,  काडेपेटी आणली. बाकीच्यांनी २-४ छोट्या-मोठ्या काठ्या घेतल्या. 'चैत्या'ने (चेतन) एक बॅटरी आणली. मीही बॅटरी आणायचं मान्य केलेलं.  घरातून बॅटरी घेऊन बाहेर पडतो  तोच आईनं  विचारलं, "कुठे निघालास रे बॅटरी घेऊन?" .... आता म्हटलं, आपण अडकतोय वाटतं!  मी म्हटलं, "एका मित्राचा वाढ-दिवस आहे, तिकडे निघालोय मी आणि सच्या". आई बहुदा काहीतरी कामात होती, त्यामुळे तिने एवढं लक्ष नाही दिलं... मीही  मग सटकलो.  

     मग आम्ही सगळे मारुतीच्या देवळासमोर जमलो. नदीकडेच्या वाटेवर हे देऊळ आहे. थोडा अंधार पडू लागलेला एव्हाना. आमच्या  ७-८ जणांच्या फौजेनं मग नदीची वाट धरली. मनात कुतूहल होतंकसं असेल नदीकडलं वातावरण आत्ताकोणी असेल का तिकडे या वेळी?  थोडं पुढे गेल्यावर २ वाटा आहेत नदीकडे जाणाऱ्या. काल गेलेलो ते धरणाकडे गेलेलो. आणि दुसरी वाट आहे ती जाते नागेश्वराच्या मंदिरासमोरून. तिकडून गेल्यावर पुढे नदीकाठी स्मशानभूमी आहे.  आणि तिथून नदीमध्ये उतरायला नीट आणि सोपी वाट आहे. संत्या-बाळ्या म्हणाले तिकडूनच जाऊ. पण काही भित्री मंडळी म्हणाली, "तिकडून नको बाबामसण वाट्याकडून  गेलो तर भुतं लागतील मागं". मग एकमेकांना खुळ्यात काढत शेवटी त्याच वाटेनं जायचं ठरलं. मळ्यातून उशिरा येणारी  काही लोकं मधेच वाटेत भेटत होती आणि मोठ्या कुतूहलाने आमच्याकडे दूरवर जाईतोपर्यंत  पाहत होती कि एवढ्या संध्याकाळची हि पोरं निघालीत तरी कुठं?  पुढे पुढे जाईल  तसं गावची वस्ती मागे-मागे राहत होती.  दूरवर कुत्री एक-सलग भूंकल्याचा आवाज कानी पडत होता. मुख्य वाटेवरून डावीकडे उताराला वळल्यावर नागेश्वराचं मंदिर लागतं. समोरून जाताना सगळेजण आपल्या स्टाईलमध्ये  पाया पडत पुढे गेलीत. मनात म्हटलं, "देवा, पाठीशी नेहमी राहा आणि व्यवस्थित घरी जाऊ दे आम्ही पुन्हा". नागेश्वराच्या मंदिराचा आवार खूप मोठा आहे आणि त्यामध्ये २ मोठ्ठी चिंचेची झाडं आहेत. तिकडून ऊउ sss ऊऊ sss असा  घुबडांचा आवाज येत होता. थोडं-थोडं धास्तीचं वातावरण आता तयार होऊ लागलं होतं.  पुढच्या वळणानंतर 'सातीसैदा' पर्यंत पोहोचलो...  म्हणजे 'सात-शहीद'...  इथे ७ जणांचे थडगे आहेत. याचा नेमका इतिहास माहित नाही, पण म्हणतात कि, अफझलखान जेव्हा शिवाजी महाराजांच्या भेटीला प्रतापगडाकडे निघालेलातेव्हा तो आमच्या गावाच्या बाजूने पुढे वाईकडे रवाना झालेला.  जाताना त्याच्या फौजेनं गावोगावची मंदीरं उध्वस्त केलेली त्याकाळी. त्याच वेळी नागेश्वराच्या मंदिरावर चाल करून आलेल्या काहींपैकी ७ जणांना आमच्या गावातील लोकांनी त्यावेळी ठार केलेलं. तर त्या ७ जणांच्या ह्या कबरी....  खरं काय आणि खोटं काय देव जाणे!!!  तर सध्या आमची फौज तिथे पोहोचलेली.  नदीपलीकडल्या  पठाणाच्या वस्तीवरूनही त्याच्या पाळीव कुत्र्यांचा भूंकलेला आवाज जोर-जोरात येत होता.  रातकिड्यांचा किर्रकिर्र sss ... आवाज एकसारखा कानी घुमत होता.  मधेच एके वेळी सगळे चुपचाप चालत  होते. मग फक्त आमच्या चप्पलांचा आवाज येत होता.  मागे राहायला नको म्हणून, नेहमी घाबरून असणारा 'चैत्या' सगळ्यात पुढे चालत होता. मधेच मला किडे करण्याची इच्छा झाली..... 'ती' idea  मी 'सच्या' च्या  कानात सांगितली.  त्यानेही खुणेनं 'हो' कार दिला. मग सगळ्यांना खुणावून  आम्ही मागच्या मागे इकडे तिकडे लपायला सांगितलं.... झालं!!! .... सगळे मागच्या मागे गायब.  'चैत्या' एकटाच पुढे चालत चाललेला काहीतरी बोलत, पण आपण बोलतोय त्यावर कोणाचा काहीं प्रतिसाद येईना हे  पाहून त्याने मागे वळून पाहिलं.... आणि त्याची पाचावर धारण बसली.....  चैत्या एकदम गप-गारच!!!  त्याच्या तोंडातून शब्दच फुटेना.  रडवेल्या आवाजात  तो एकेकाला हाक मारू लागला .... सच्याsss!!!  पन्याsss!!! 'बंड्या'ने मुद्दाम  कसलातरी विचित्र आवाज काढला तसा चैत्या अजूनच टरकला.  मग गया-वया करून सगळ्यांना  बोलाऊ लागला. सगळ्यांनी मग ओरडून एकदम त्याच्यावर हल्लाबोल केला. चिडलेला आणि भरपूर घाबरलेला चैत्या सगळ्यांना शिव्या द्यायला लागला. कशीतरी त्याची समझुत काढत पुढे चालत राहिलो आम्ही.  पुन्हा निरव शांतता! थोडं पुढे गेल्यावर बाजूलाच स्मशान-भूमी. तिच्या  शेजारूनच निघालो.  चोरून मधेच तिकडे लक्ष जात होतं. बहुतेक काल कोणालातरी तिथे काडी लावली होती! म्हणजे.....  तिथे काल कोणालातरी दहन केलं असावं. कारण थोडा लाल निखाऱ्याचा विस्तव दिसत होता. आमच्यातले २-४ फारच घाबरट होते. त्यांना आम्ही 'कच्चं लिंबू' म्हणत असू.  'ते'  लगेच एकमेकाचा हात पकडून आपल्याबरोबर आणखीही कोणीतरी घाबरतंय याची खात्री करून घेत होते.  तसेच पुढे सरसावत नदीच्या काठावर येऊन ठेपलो. नदीच्या पाण्याचा खळखळ आवाज येत होता. एकसारख्या वाहणाऱ्या झऱ्यांचा  एक मंजूळ आवाज एका तालावर येत होता. वाऱ्याने हलणाऱ्या झाडाच्या पानांची सळसळ मधेच आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होती.  एका मोठ्या झाडाची एक फांदी जोराचा वारा आल्यावर कर्रsss कर्रsss वाजत होती.  मध्येच झाडावरच्या पक्षांची अचानक भांडणं लागल्यासारखी ह्वायची.  रातकिड्यांचा किर्रकिर्र sss किर्रकिर्र sss ... हा आवाज, आता फारच वेगाने  येत होता.  २ मिनिटे सगळेच स्तब्ध उभे होते. संत्या अजून 'चैत्या'ची खेचण्याच्या मूडमध्ये होता.  'तो' चैत्याला म्हणाला,  ते बघ तिकडं,  नदीच्या त्या काठावर एक पांढरी आकृती दिसतेय का? ती बघ ती, पाय हलताना दिसतायत का तिचे? 'चैत्या' आता वैतागलेला, त्याला वाटलं असेल  'झक मारली आणि आलो ह्यांच्याबरोबर'.  मी म्हटलं, ' बास झाली आता चेष्टा-मस्करी..' .
  
        झालं, आम्ही पुसटश्या दिसणाऱ्या पायवाटेवरून नदीमध्ये उतरू लागलो. आमची नदी म्हणजे  काही कोल्हापूरची 'पंचगंगा' किंवा सांगलीला वाहणारी 'कृष्णा' नव्हे.  साधारण १० मीटरच्या रुंदीमध्ये अर्ध्या अर्ध्या मीटर रुंदीचे १-२ प्रवाह वाहत असतील पाण्याचे, तेही मोठ-मोठाल्या खडकांच्या अधून मधून वाहायचे. इतर ठिकाणी छोटी-मोठी डबकी पाण्याची. कारण पावसाळा संपून २-३ महिने उलटले होते. पण पाणी बऱ्यापैकी होतं. आमच्या नदीला पोहायला जायचं म्हटलं तर तशी २ ठिकाणं होती. एक म्हणजे 'सोमनाथ' आणि दुसरं म्हणजे 'ब्राम्हण डोह'. श्री सोमनाथाचं मंदिर नदीकाठी असल्याने त्या साडेचार फूट खोलीच्या डोहावर पोहायला जाताना आम्ही  'सोमनाथावर पोहायला जाऊअसं म्हणायचो. आणि ब्राम्हण डोहाला ते नाव का आहे हे मला नाही माहित. असो. मग, तोडलेल्या टायरीचे २ तुकडे आम्ही पेटविले आणि त्याचा मशालीसारखा उपयोग करत एकमेकांना हाताला धरून थोडा थोडा अंदाज घेत आम्ही नदीपात्रामध्ये उतरू लागलो. तसा अगदीच गडद अंधार नव्हता, आम्ही सगळे दिसत होतो एकमेकांना. उगाचच इकडे तिकडे बॅटरी मारून नदीवरचं वातावरण पाहत होतो मी. मधेच झाडीवेली वाऱ्यावर हालताना दिसायची, बॅटरीच्या उजेडाने एखादा पक्षी भुर्रकन उडून जायचा. एक वेगळाच अनुभव होता तो! मग त्या खडकांवरून इकडून तिकडे उड्या मारत आमचं खेकडे शोध-सत्र सुरु झालं. संत्या म्हणजे जणू "जंगल बूक" मधला 'मोगली'च होता. साल्याला बरोब्बर माहित असायचं सगळं, खेकडे कुठे सापडतात, मधाचे पोळे कुठे सापडतात, कुठली कुत्री पाळीव आहेत, कुठली मागे लागून फाडून खातात वगैरे वगैरे. पहिलाच जम्बो खेकडा त्याने ओरडत ओरडत पकडला. पाठोपाठ दुसराही पकडलेला, पण तो नांगी जास्त मारतोय म्हणून मग त्याने सोडून दिला. एकीकडून 'मच्या' आणि 'चैत्या' नुसताच कालवा करत होते, कोण शेवाळ्यावरून घसरून आपटत होतं, तर कोणाच्या पायावरून बेडकांनी उड्या मारल्या म्हणून पाय झाडून ओरडत होतं. तिकडून बाळ्यानेही आवाज दिला, त्यानंही एक खेकडा पकडून अकाऊंट खोललं. 'मी' आणि 'सच्या' फक्त बॅटरी दाखऊन खेकडे खडकाखालून बाहेर काढायला मदत करत होतो. या पूर्ण कार्यक्रमामध्ये मी एकाही खेकड्याला हात लावला नाही. ना माझी इच्छा झाली खेकड्याला हात लावायची. मी ह्यांच्याबरोबर म्हणजे एक वेगळा थ्रिलिंग अनुभव घेण्यासाठी आलेलो. मला मुळात त्या खेकड्याची पहिल्यापासून किळस वाटते. कारण, लहान असताना जेव्हा शाळेत जायचो ना तेव्हा बाजार चौकामध्ये नेहमी २-३ कातकरी लोक टोपलीमध्ये खेकडे घेऊन विकायला बसलेले असायचे. आणि त्या दारुड्या लोकांचा एकंदर अवतार पाहून त्या वळवळणाऱ्या प्राण्यांच्या बद्दलही तेव्हापासूनच मला किळस वाटते. काय म्हणून लोक त्यांच्याकडून हे प्राणी विकत घेतात आणि ते शिजवून खातात, देव जाणे. पण ह्या वेळी मी त्या खेकड्याने माणसाच्या हाताचा चावा घेतानाचाही क्षण अनुभवला. बघता-बघता बादलीमध्ये ७-८ खेकडे साठले. टायरीचे एव्हाना ३-४ तुकडे संपले होते. तेवढ्या भागातले खेकडे आता बहुदा सावध झाले होते, कारण आता एक तासाभरानंतर एकही खेकडा सापडेनासा झाला. थोडं पुढे चालून गेल्यावर रोडवरच्या एका मोठ्या पुलाखाली एक धरण वजा बंधारा आहे. तिथे पाण्याचा थोडा मोठा साठा आहे. पण खडकांवरून इकडून तिकडे करून आम्ही तिघे-चौघे कंटाळलो होतो. मग आम्ही काही लोक तिथे वरती येऊन स्मशान-भूमीच्या शेडमध्ये गप्पा मारत बसलो. बाकीची उत्साही मंडळी तिकडे धरणाखाली जाऊन आणखी काही खेकड्यांच्या जीवावर चाल करून गेली. आमच्या थ्रिलिंग गप्पा सुरु झाल्या. 'इक्या' आणि 'चैत्या'ला घाबरवायची हि साजीश होती. ४ वेळा चैत्या, " दुसरा काहीतरी विषय काढा कि राव" म्हणत सारखा विषय बदलू पाहत होता. आणि आम्ही त्यांची खेचण्याच्या मूड मध्ये होतो. शेजारच्या चितेच्या निखाऱ्यावर कोण जाऊन हात शेकून येईल अशी पैज लागली. शेवटी गेलो कोणीच नाही, कारण रात्रीची भीती गेली असली तरी, हे म्हणजे थोडं विचित्रच काम होतं!
         पण खरंच, एक आगळा-वेगळा अनुभव होता तो सगळा! रात्रीची भयान शांततारातकिड्यांचा किर्रकिर्र sss किर्रकिर्र sss ... हा आवाजगावात कुत्री ओरडल्याचा आणि रडल्याचा विचित्र आवाज,  झाडांची सळसळ,  मधेच झाडावर पक्षांची चुळबूळ, नदीच्या पाण्याचा, झऱ्यांचा एका लयीत होणारा आवाज, हे सगळं मी रात्रीच्या वेळी नदीकाठी मनसोक्त उपभोगुन घेतलं. अर्थात ह्या आनंदासाठीच तर मी सगळ्यांबरोबर इथे आलो होतो.
       मग थोड्या वेळाने पुढे गेलेली मंडळी अर्धी बादली भरून खेकडे गोळा करून आली. आणि आम्ही त्यांचे तिकडचे अनुभव ऐकत ऐकत पुन्हा घरची वाट धरली. दंगा-मस्ती करत करत, एकमेकांना चिडवत, आम्ही पुन्हा परतलो...... एक वेगळा अनुभव मनात घेऊन. कधीही न विसरण्यासारखा........


कविता लिहिलेली,
तारीख: १३/१२/२०११   
स्थळ: SAINT-GOBAIN, अंधेरी(पूर्व), मुंबई.