या इथे चप्पला काढा, हार फुले घ्या ताई,
चप्पल आत चालत नाही, प्रसाद-नारळ घ्या माई.
हार-फुले वाल्यांची सगळीकडेच ही घाई,
देवाचं नंतर ह्यांचंच आधी दर्शन होई.
कुठेही जावा शिर्डी, पैठण, शेगाव, पंढरीपुरी,
नाहीतर जावा तुम्ही गाणगापूर, तुळजापुरी.
हल्ली ह्यांचं हे फ्याडच झालंय न्यारी,
गिऱ्हायिक पटवण्याची ह्यांची रीतच भारी.
त्यांनाही माणसाची वृत्ती आता माहित झालीये,
कि देवळात गेला तरी चप्पलांची माणसाला काळजी लागतीये.
माणसंही किती विचित्र पहा,
नारळ घेतील एक आणि चप्पला ठेवतील दहा.
शेजाऱ्याच्या दुकानात हार-फुले घेतली तर हयांचा जीव होतो अर्धा,
काय करणार माणूस तरी, त्यांच्यात झालीयेच तेवढी आता स्पर्धा.
घेतात हे ५० रुपये अन् त्यात असतं १२ रुपयांचं भांडवल,
माणूस म्हणतो, कशाला नसता वाद? घे ताट आणि चल.
चार पैसे जाऊ दे गेले तर पण यिडा-पिडा लागायला नको.
वाहताना देवाला काही कंजूसपणा दाखवायला नको.
अहो पण ही भीती फक्त भक्तगणांनाच का?
खोटेपणा करायची मक्तेदारी देवाने ह्यांना दिलीये का?
त्यापेक्षा गरिबाला अन्नदान करावं, नाहीतर अन्नाछत्रासाठी देणगी द्यावी.
अपेक्षा एवढीच कि दिलेली देणगी सत्कारणी लागावी.
देवाला फक्त तुमची नितांत श्रद्धा आणि प्रेम हवे असते.
वाहिल्या आपण तर हराळी, बेल-फुले आणि भक्ती हवी असते.
स्वच्छ शरीरानं आणि निर्मळ मनानं देवाची उपासना करा.
पैसा, ऐशोआराम आणि वस्तू मागण्यापेक्षा हात जोडून फक्त प्रार्थना करा.
कोणाला काय द्यायचं आणि कोणाकडून काय घ्यायचं हे देवाला ठाऊक असतं.
आपण फक्त निःस्वार्थीपणे आणि मनोभावे देवाला शरण जायचं असतं.
कविता लिहिलेली
तारीख: ०९/०२/२०१२
स्थळ: SAINT-GOBAIN , अंधेरी(पूर्व), मुंबई.