बुधवार, १४ ऑगस्ट, २०१३

श्रीयाळ षष्ठी - श्रीयाळ शेठ राजाची महती








इतिहास -
भगवान श्री शंकरांच्या काळामध्ये, श्रीयाळ शेठ नावाचा एक राजा होता, तो भगवान शंकरांचा निःसीम भक्त होता. देवाच्या कृपेने त्याच्याकडे सर्व काही व्यवस्थित होते. त्याची चांगुणा नावाची राणी होती. आणि ह्या राजा-राणीला चिलया नावाचं एकुलतं एक बाळ होतं. श्रीयाळ-शेठ आणि चांगुणा राणी हे आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला अन्नदान करीत. त्यांच्याकडे येणारी कोणतीही व्यक्ती कधीच उपाशी जात नसे. आणि हे राजा-राणी आपल्याकडे येणाऱ्या प्रत्त्येक व्यक्तीला जे हवं ते उपलब्ध करून देत असत. कधीही कोणाला न दुखावता आणि उपाशी न ठेवता त्यांची अन्नाची अपेक्षा पूर्ण करत असत. तर एकदा भगवान शंकरांनी त्यांची परीक्षा घ्यायची ठरवलं. आणि एका साधूचं रूप घेऊन त्यांच्या घरी भिक्षेसाठी आले. श्रीयाळ-शेठ राजा हा जातीने वाणी होता आणि शुद्ध शाकाहारी होता. पण ह्या साधूने "मला नरमांस हवे" अशी इच्छा बोलून दाखवली. पण श्रीयाळ शेठ राजाचा नियम होता कि दारी येणारा कोणताही वाटसरू उपाशी जाता कामा नये. मग नर-मांसाची उपलब्धता करत असताच पुन्हा एकदा साधूने मागणी केली कि मला तुझ्या बाळाचेच मांस हवे. मग मात्र चांगुणा राणीवर दुःखाचा डोंगर पसरतो. पण तरीही अन्नदानाचा नियम मोडू नये आणि आपल्या घरून कोणी उपाशी जाऊ नये यासाठी मुलाचं धड आणि शीर वेगळं करते. एकुलत्या एक बाळाची आठवण म्हणून बाळाचं कांडण केलेलं शीर ती बाजूला काढून ठेवते. आणि मांस शिजवते ते फक्त धडाचं. जेव्हा ते साधू पुढे आणलं जातं तेव्हा त्याच्या लक्षात येतं कि चांगुणा राणीने शीर बाजूला काढून ठेवलं आहे आणि ताटामध्ये वाढून आणलेलं मांस हे फक्त धडाचं आहे. पुन्हा एकदा क्रोधीत होऊन साधू उठू लागतो कि तुम्ही माझी फसवणूक करीत आहात म्हणून. पण मग श्रीयाळ-शेठ राजा आणि राणी त्या साधूचे पाय धरतात आणि माफी मागतात. आणि करुन भाकतात श्री शंकराला कि भगवंता आता आमची किती परीक्षा पाहणार आहेस. मग चांगुणा राणी जाउन ते शीर कांडण करून शिजउन साधूला आणून देते. आणि मग राजा-राणी बोलतात कि हे साधू आता तरी आमचं सत्त्व राख आणि हे भोजन ग्रहण कर. मग साधू (भगवान शंकर) त्यांचा त्याग पाहून प्रसन्न होतात. आणि मग राजा-राणीला सांगतात कि मी प्रसन्न झालो आहे तुमची भक्ती पाहून. आणि चांगुणेला विचारतात कि तू मला हव ते शिजऊन घातलस, तुला काय हवा तो इच्छित वर माग. ती बिचारी आई पोटचं एकुलतं एक बाळ गेल्याच्या विरहाने हंबरडा फोडते आणि चिलया बाळाला मोठमोठ्याने हाका मारते, साधूला म्हणते कि लोक आता मला वांज म्हणतील आणि हा कलंक मला लागेल. माझा हा कलंक तू धुऊन टाकू शकतोस का? ….पाहते तर काय… चिलया बाळ समोरून धावत येते आणि आईला बिलगते. मग भगवान शंकर खरं रूप धारण करतात आणि त्या दोघांना दर्शन देतात. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो. श्रीयाळ-शेठ राजा आणि चांगुणा राणी साक्षात भगवंतांच्या दर्शनाने धन्य पावतात. भगवान शंकर मग सांगतात कि तुमची परीक्षा घ्यायला मी आलो होतो आणि तुमची भक्ती अगाध आहे. अशा या भगवान शंकर भक्ताचं म्हणजेच श्रीयाळ शेठ राजाचं राज्य फक्त साडेतीन घटकांचं होतं. म्हणून ह्या राजाला औट घटकेचा राजा असं संबोधलं जातं. औट घटकेचा राजा हा शब्दप्रयोग बारा वर्षांच्या दुर्गादेवीच्या दुष्काळात (१३९६-१४०७) शिराळशेठीने लोकांना केलेल्या प्रचंड मदतीने खूष होऊन बहामनी राजाने त्याला पाहिजे ते मागायला सांगितल्यावर त्याने औट(साडेतीन) घटकांंसाठी सिंहासनावर बसून राज्यकारभार करू द्यायची मागणी केली आणि ती मान्यही झाली यावरून आला आहे 

संदर्भ -
श्री शिवलीलामृत - अध्याय १४ वा

चित्राची माहिती -
वरील चित्रामध्ये श्रीयाळ राजाचा राजवाडा आणि आतमध्ये अन्न- धान्न्यांनी भरलेली मातीची भांडी, तसेच अन्न बनवण्यासाठी लागणारी मातीची भांडी आहेत. वरती २ घोडे आहेत. एका घोड्यावर श्रीयाळ-शेठ राजा आणि त्याचं चिलया नावाचं बाळ आहे आणि दुसऱ्या घोड्यावर चांगुणा राणी … अशा सगळ्या प्रतिकृती आहेत. शिवकालीन किंवा पूर्वीच्या काळी घरांना सजवण्यासाठी धान्न्यांचा वापर करण्यात येई. म्हणून या महालाला डाळ आणि करडईने सजवलेलं आहे. आतील मातीच्या भांड्यांमध्ये डाळ, तांदूळ, गहू, ज्वारी, साखर इ. धान्ये भरून ठेवलेली असतात.

हे व्रत आम्ही करण्याचं कारण -
आमचे आजोबा वै. रघुनाथ विष्णूशेठ मोहोटकर (दादा) हे भगवान श्री शंकराचे परम-भक्त होते. त्यांना १९३१ साली पहिली मुलगी झाली. तिचं नाव अनुसया. त्यानंतर २-३ वर्षांचा कालावधी लोटला. मग मुलगी थोडी मोठी झाल्यावर एक मुलगा व्हावा असं त्यांना वाटे. मग त्यांनी भगवान श्री शंकरांची उपासना केली आणि नवस केला भगवान शंकराला कि मला जर मुलगा झाला तर मी दर श्रीयाळ षष्ठीला श्रीयाळ राजाची आराधना आणि यथासांग पूजा-अर्चा करेन. मग कालांतराने त्यांना १७ डिसेंबर १९३६ रोजी त्यांना  मुलगा झाला आणि आजी-आजोबांनी त्या मुलाचं नाव ठेवलं “शिवदास”. कारण भगवान शंकरांच्या भक्तीने आणि केलेल्या नवसाने त्यांना पुत्रप्राप्ती झालेली. भगवान शंकरांच्या निःस्सिम भक्तीचं फळ त्यांना मिळालं. आणि म्हणूनच हा वसा त्यांनी आयुष्यभरासाठी पुढे सुरु ठेवला. भल्या पहाटे शेतातून ताजी माती आणायची, ती मळायची आणि मग त्या मातीचा वरील चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे लाकडी पाटावर श्रीयाळ-शेठ राजाचा महाल बनवायचा, त्यामधली भांडी बनवायची, राजा-राणी आणि चिलया बाळाची घोड्यावर बसलेली प्रतिकृती बनवायची, तो महाल डाळ, करडई इ. धान्याने सजवायचा, त्यावर लिंबाचे डहाळे रोवायचे (जसे आपण गुढी-पाडव्याला गुढीला बांधतो). मग राजा-राणीला वस्त्र घालायचे आणि या सर्वांची यथासांग पूजा करायची. पूजेनंतर लोकांना तीर्थ-प्रसादाला बोलावून त्याचं दर्शन घडवण्याचं पूण्य मिळायचं. साडेतीन घटकेनंतर म्हणजे तिन्हीसांजेला या श्रीयाळ-शेठ राजाचं मग नदीला विसर्जन करायचं. नदीला विसर्जनाला जाताना "श्रीयाळ-शेठ वाण्या, खोबऱ्याच्या गोण्या" असा जयघोष करत, श्रीयाळ-शेठ राजाची प्रतिष्ठापना केलेला पाट डोक्यावर घेऊन जायचा. नदीला गेल्यावर गणपतीची आणि शंकराची आरती म्हणायची आणि नैवेद्य दाखऊन गणपती बाप्पा सारखंच विसर्जन करायचं. येताना मग नदी जवळच असलेल्या नागेश्वराच्या मंदीरात आरती करून, प्रसाद ठेऊन परत यायचं. येताना "विठूचा गजर-हरी नामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडीला" असा जयघोष करत घरी परतायचं. नक्की साल माहित नाही पण साधारण १९३३ सालापासून श्रीयाळ राजाची प्रतिष्ठापना आमच्या घरी श्रीयाळ-षष्ठीला केली जाते.… आज आमचं दुर्दैव कि आमचे आजोबा हरिभक्तपरायण वै. रघुनाथ विष्णूशेठ मोहोटकर, ज्यांनी ही प्रथा सुरु केली ते आणि ज्यांच्या जन्मासाठी सुरु केली ते आमचे मोठे चुलते कै. शिवदास रघुनाथ मोहोटकर हे दोघेही आज आमच्यामध्ये नाहीत. पण आमच्या आजोबांनी आपल्या घरी घालून दिलेली हि परंपरा आजही आमचे वडील आणि आम्ही मुलं जपतो आहोत. १९३३ साली सुरु केलेल्या ह्या परंपरेला आज या वर्षी ८० वर्षे पूर्ण झाली आहेत. भगवान शंकरा-चरणी एवढीच प्रार्थना कि ही परंपरा अशीच आमच्या हातून सुद्धा अखंड सुरु राहो आणि आमच्या हातून भगवंताची सेवा घडो.

|| श्री सांबसदाशिवार्पणमस्तु - शुभं भवतु ||


लेख लिहिलेली तारीख: १२ ऑगस्ट २०१३
तिथी: श्रावण शुक्ल (श्रीयाळ) षष्ठी
ठिकाण: कात्रज, पुणे.

मंगळवार, ६ ऑगस्ट, २०१३

दिप अमावस्या




आषाढ अमावस्या दिप अमावस्या म्हणून ओळखली जाते अलीकडे गटारी अमावस्या हे नवीन बिरूद तिला प्राप्त झाले आहे. आषाढ महिन्यात पावसाची रिपरिप चालू असते, जमीन आपले रूप बदलून हिरवाईने नटत असते, आपल्याला धरणीने भरभरून द्यावे. सततच्या पावसाने निर्माण झालेली रोगराई दूर जावी ही लोक मनाची भावना, गावामधून इडापीडा बाहेर काढण्यासाठी दृष्ट शक्तींना बळीचे आमिष देवून गावाचे सीमेबाहेर काढण्याचे विधी केले जातात. तसेच आपले रक्षण करावे म्हणून या काळात लोक गावातील ग्रामदेवतांची करूणा भक्तात. या देवताना नेवेद्य देऊन संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतात. अमावस्या हा महिन्यातील शेवटचा दिवस महिनाभरात राहिलेले सर्वच विधी या दिवशी पुर्ण केले जातात, आपल्या मागील सर्व पीडा जाऊन जीवनात प्रकाश निर्माण व्हावा म्हणून या अमावसेचे सायंकाळी घरामधील सर्व दिव्यांचे पुजन केले जाते. या दिवशी पितळी दिवे, समया, निरांजनी, तांब्याचे दिपदानातले दिवे, लामणदिवे, कापूरवाती लावायच्या आरत्या अश्या सर्वांची पूजा केली जाते, संध्याकाळी दिवेलागणीला ओटीवर गाईच्या शेणानं सारवायचं. रांगोळी घालून त्यावर पाट ठेवायचा. त्यावर सर्व दिवे ओळीने मांडून त्यांना हळदकुंकू, अक्षता, फुलं वाहायची. कणकेचे गोड, उकडलेले दिवे करायचे, आणि मग त्यात साजुक तूप आणि कापसाची वात घालून सर्व दिवे पेटवून त्यांनी दिव्यांची आरती करून देवाला नैवेद्य दाखवितात. भारतीय संस्कृतीमध्ये दिवा, ज्योती, वात, फुलवात, यांना महत्त्वाचे स्थान आहे प्राणाला प्राणज्योत म्हणले जाते, दिवा व प्रकाश यांचे जीवनाशी नाते मानले जाते. सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी लक्ष्मी घरात येते व त्याचवेळी दारिद्याची देवता निघुन जाते अशी कल्पना आहे.ही अमावस्या विविध नावानी ओळखली जाते ‘दिवली अमावस्या‘, ‘दिव्याची आवस‘ या दिवसाची एक कहाणी ही प्रचलित आहे. काही ठिकाणी दीप पूजना वेळी हे वाचण्याची प्रथा आहे आटपाट नगर होतं, तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खालला आणि उंदरावर आळ घातला..आपल्या वरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेंव्हा आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला. त्यांनी रात्री हिंची चोळी पाहुण्याच्या आंथरुणांत घेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासू-दिरांनी निंदा केली, घरातून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवांत करावी, ते स्वतः स्वतः लावावे, खडी-साखरेनं त्यांच्या ज्योति साराव्या , दिव्यांच्या अंवसेचे दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्या प्रमाणं ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं. पुढं ह्या अंवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येतं होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टिस एक चमत्कार पडला. आपले सर्व गांवातले दिवे अदृश्य रुप धरुन झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत. कोणाचे घरी जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली, वगैरे चौकशी चालली आहे. सर्वत्रांनी आपापल्या घरी घडळेली हकिकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला. बाबांनो काय सांगू? यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य दिवा असायचा, माझा थाटमाट जास्ती व्हायचा, त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं. असं होण्याचं कारण काय..? मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू ? मी ह्या गांवाच्या राजाच्या घरचा दिवा . त्याची एक सून होती, तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खालला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला.. इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेंव्हा आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला. त्यांनी रात्री हिंची चोळी पाहुण्याच्या आंथरुणांत घेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासू-दिरांनी निंदा केली, घरातून तिला घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दर वर्षी माझी मनोभावं पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो..! असं म्हणून तिला आशीर्वाद दिला. घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली. तिला मेणा पाठवुन घरी आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. सा~या घरांत मुखत्यारी दिली.ती सुखानं रामराज्य करू लागली. तर जसा तिला दिपक पावला आणि तिच्या वरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो व या दिव्यांचा आशीर्वाद सतत पाठीशी असावा हाच यातील संदेश.अलीकडे या उत्सवाला एक नवीनच नाव लाभले आहे ते म्हणजे 'गटारी अमावस्या ' आषाढ महिना संपल्या नंतर श्रावण येतो आणि नंतर भाद्रपद या महिन्यामध्ये मद्यपान व मांसाहार वर्ज मानला जातो. मंग या सर्वाचे शोकीन आषाढ मधील हा दिवस पुन्हा काही दिवस हे मिळणार नाही म्हणून मद्यपान व मांसाहार याने साजरा करतात, तर काही बेधुंद होऊन गटारात लोळतात. म्हणून हे नाव मिळाले असावे. आधारावर मात करून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या दिव्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उत्सव या पद्धतीने साजरा करणे अयोग्यच.