मी गर्दीत वाट हुडकतोय.................
रोज सकाळ होते, मी जागा होतो, पूर्वीही सकाळ व्हायची मी जागा व्हायचो. उठून शाळेत जायचो, गर्दीत सामील व्हायचो, बे एके बे पासून १० वी पर्यंत मी गर्दीत चालत राहिलो, लोक वक्तृतव स्पर्धेत भाग घेतात म्हणून मी ही घेत राहिलो, आणि अमुक एक क्लास चांगला आहे म्हणून मी पण जात राहिलो. शाळा झाली, सगळे डिप्लोमा करतात म्हणून मी ही केला, सगळे जण ढीग भरून फॉर्म भरतात म्हणून मी ही भरत राहिलो.
शेवटी काय मी पण गर्दीत चालत राहिलो. ........................
डिप्लोमा नंतर सगळे कंप्यूटर क्षेत्रात जातात म्हणून मी पण गेलो. अमुक यांचा तो आणि तमुक यांची ती सध्या एमनसी कंपनीमधे असते , इतके हजार पगार मिळतो हे ऐकत राहिलो, मी पण त्यांच्यातलाच व्हायच्या तयारीला लागलो. अरे तो यूएस ला गेला, हा यूके हून आला, तो युरोप मधे सेट्ल झला... हे ऐकत मी पण इंजिनियर होत गेलो. सगळे कॅम्पस मधे जातात तसा मी पण गेलो आणि पुन्हा एकदा त्याच गर्दीत एक दिवस सॉफ्टवेर इंडस्ट्री मधे उभा राहिलो.
शेवटी काय मी पण गर्दीत चालत राहिलो............................
लहान पणापासून गर्दीचा संस्कार झालेला मी असाच आयुष्यात वाहत गेलो. माझेही इंडक्षन झाले , काम झाले, कष्ट झाले, अप्रेज़ल झाले, मॅनेजर ला शिव्या देणे झाले, ५-६ स्विच झले, पॅकेज वाढले. मी एक पक्का सॉफ्टवेर इंजिनियर झालो. मी पुर्वी पंकज द्वारकानाथ मोहोटकर मधला "पन्या / पंक्या" होतो, आता "पी. एम." झालो आहे. आता सगळ्या गोष्टी पैशात मोजू लागलो आहे. एक दिवस लक्षात आले कि मी गर्दीत आहे खरा, पण मला कोणी जवळचा नाही, वीकेंडला रस्त्यात कुठे भेटेल तिथे उभे राहून माझ्याबरोबर तासभर गप्पा मारणारा मित्र नाही.
मी पण आता अगदी मित्रच नसले तरी पण कलीग बरोबर रिकामा वेळ घालवतो, वीकेंड ला फालतू गप्पा आणि लंच/ डिनरसाठी तडफडतो. घरात पण मी नसतो कारण रोज १२ / १३ तास गर्दीत असतो, २ दिवस मिळतात म्हणून घरातले वीकेंड ला मला “जाउ दे त्याला निवांत” म्हणून सोडून देतात. असा मी आज काल गर्दीत असलो तरी एकटाच असतो. आज काल मी टिपिकल सॉफ्टवेरवाला झालो आहे, माझी कंपनी, माझे पॅकेज, माझे डेसिग्नेशन, माझा वेरियबल, माझी कार ... सगळ्याना दाखवत बसतो…. पण का काही कळत नाही कुठे तरी मनात कुरकुरतो, …....
फेसबुक वर मला ढीग भरुन कमेंट्स येतात, फेसबुक, इन्स्टा वर शेकडो फ्रेंड्स भेटतात, सगळे कमेंट्स शेवटी केरात जातात आणि फ्रेंड्स हे फक्त फ्रेंड्स राहतात. त्यातलाच कोणी काय भावा कुठे असतोस? भेट कि जरा चहा मारु.. असं बोलत नाही, आणि आज काल आई-आप्पा कुठं तुझ्याकड की गावाकडं? असले प्रश्न पण विचारत नाही. कोणी फोन करुन, "लेका गावाकडं ये कि एकदा", किंवा "यंदा तरी जत्रेला ये कि भावा" असे पण म्हणत नाही, मला कोणीच फेसबुक वरचा ये की मर्दा घराकडं एकदा जेवाय,असे पण म्हणत नाही, आम्ही ढीग आउटिंग /पार्ट्या करतो पण त्याची मजा यात नाही. गावाकडे आहेत काही मित्र, पण मी तिकडे जात नाही, आज कुठे तरी हुरहूर वाटते आहे की मी माझे पक्के दोस्त गमावल्याचे, ते गावाकडचे असले म्हणून काय झाले त्या हाकेसारखी आर्तता इथल्या फ्रेंड्सच्या इंवीटेशन मध्ये जाणवत नाही. लोकही माझे मेल / कमेंट्स / पीकासा आल्बम पाहतात आणि ते पण, “च्यायला हा ऑनसाइट जाऊन आला वाटतं” असे म्हणत फोटो न बघता लॉग ऑफ मारतात, त्याना फार आवड नसते बघायची, एखादा कॉमेंट टाकून बस गर्दीचा नियम पाळत असतात.
गर्दीत राहून पण मी आज एकटा आहे………नावाला फक्त लोक गर्दीत उभे आहेत, आयुष्यात एक वेळी अशी येते की ही गर्दी कामात येत नाही, कलीग म्हणणारे तुमचे जवळचे तुमच्या सुखात नक्की एन्जॉय करायला येतील, पण दुखा:च्या वेळची ग्यारंटी नाही. पण तुम्ही सुधा दु:खी व्हाल, त्या वेळेला कलीग, डिलीवरेबल्स, मीटिंग्समधे व्यस्त असतील आणि वीकेंड ऑलरेडी प्लान झाला रे.... सॉरी... असे म्हणत कलटी टाकतील. सॉफ्टवेर वाला झाला म्हणून काय?? दु:ख कधी तरी येतेच त्याला तुम्ही इंस्टालमेंट अमाउंट देऊन टाळू शकत नाही. प्रत्येक अडचण पैश्याने सोडवता येत नहीं. अश्या वेळी लागतात ते फक्त मित्रच, जे बिचारे कधी कलीग नसतात अणि ते कुठल्याच गोष्टी पैश्यात मोजत नसतात.
मी विचार करतो की मी या गर्दीत का चालत राहिलो?? सगळे करतात तेच बरोबर असेल, जे काय व्हायचे ते सगळयांचे होईल, या गर्दीच्या फुटकळ तत्वावर विश्वास ठेवत राहिलो. काय असते ही गर्दी? इयत्ता १ ली ते …..इंटरव्यू राउंड पर्यंत काय करते ही गर्दी?? कोण ठरवतो यांची दिशा? या गर्दीत कोणच कुणाला ओळखत नाही......पुढचा चालतो म्हणून मागचे चालतात..आणि मागे खूप लोक आहेत म्हणून पुढचा चालत राहतो.
बसस्स.......आता ...ठरवले आहे…आणि सुरुवातही केलेली आहे, कलीग म्हणतात हा आज काल वीकेंड ला येत नाही बरोबर, हा थोडा वेगळाच वाटतो आहे, लास्ट वीक म्हणे तेच्या गावी गेला होता तिथे सुट्टी टाकून त्या लोकांबरोबर राहिला. आज काल म्हणे पुन्हा आळंदीला ज्ञानेश्वरांच्या मंदिरात जातो, ए हा असा का करतो? या वेळी वारीला सासवडपर्यंत पायी गेला होता म्हणे, अजुन काय तर या वेळी म्हणे पुन्हा "घुमाई देवी" च्या यात्रेला गावी जाणार आहे, हे हा खरेच असे करणार आहे? मी थोडा वेगळा झालो आहे, गर्दीत आत्ता थोडी कुर्बुर आहे , अगदी मान खाली घालूनच चालत आहे..........लोक वाट चुकलेला का म्हणेना मला……पण मी मान खाली घालून माझी वाट शोधत आहे. एकदा विचार करा मित्रांनो या सगळ्या गडबडीत आउटकम काय?? समाजात फक्त आपण आपल्या नावावर काही “स्क्वेयरफुट” घेण्यासाठी धडपडत आहोत काय?? का उगाच फ्रेंड्स ग्रुप वरचे फ्रेंड्स काउंट दाखवून स्वत:चे समाधान करत आहोत काय?
आपलाच,
...... गर्दीत हरवलेला एक मित्र,
...... गर्दीत हरवलेला एक मित्र,
टीप: सदर लेख हा माझा मित्र श्री. सचिन कुलकर्णी (सातारा) यांचा आहे. त्यांनी तो साधारण २०१० मध्ये लिहिलेला आणि मला तो आवडल्यामुळे मी स्वतः साठी तो बदल करून लिहिला.