पूर्वीची
लोकं ना वर्षभर पुरेल
आणि वेळेला पाहुण्या-रावळ्यांना देता येईल एवढा
धान्यसाठा घरात ठेवायची. जुन्या
काळातल्या धान्याच्या कणग्या पाहिल्या तर अंदाजे ४-५ पोती धान्य
मावेल एवढ्या मोठ्या. सुगी झाली कि
गहू, ज्वारी, बाजरी वाडवून, वाळवून, पाकडून, त्यात लिंबाचा पाला घालून ठेवायचीत.
नवरात्रीच्या आधीच्या हंगामात मूग, चवळी, घेवडे,
भुईमूग, हरभरे, धने नीटनेटके करून,
काही राखेत घालून डबे भरून ठेवायचे.
घरात कोणत्याही ऋतू मध्ये २
वेळचा स्वयंपाक होईल अशी धान्न्ये
आणि कडधान्ये भरभरून असायची. शेतातली करडई, सुर्यफूल काढली कि गावातल्या घाण्यावरून
तेल गाळून आणायचं आणि दीर्घकाळ टिकेल
असं साठवून ठेवायचं. उन्हाळ्याची चाहूल लागली कि वर्षभर लागणारे
पापड, सांडगे, शेवया, खारवड्या-कुरवड्या-भातवड्या, तिखट, लोणची सुरु व्हायचं... आणि
हे सुद्धा अगदी पुढच्या उन्हाळ्यापर्यंत
पुरेल एवढं. ताजा भाजीपाला शेतात
असायचा आणि फळं खायची
ती त्या त्या ऋतूंमध्ये
येणारीच .... अगदी झाडावरची तोडूनच,
पाडाला लागलीयेत का ते पाहूनच.
दारात दावणीला गुरं-ढोरं बांधलेली
असायची त्यामुळे घरचं घट्ट दूध,
दही, लोणी, ताक, तूप सगळं
मुबलक असायचं.. अगदी वर्षभर. कोणी
पाहुणा-रावळा आलाच तर घरच्या
घरी चक्का आणि श्रीखंड. बर
त्यावेळचे पाहुणचाराचे बेत म्हणजे श्रीखंड,
पुरण-पोळी, खीर, शिरा आणि
हेही सगळं उपलब्ध असायचं.
उपवास-तापास आले कि शेंगदाणे,
गूळ, वरई हेही असायचं.
वर्षभर लागणारी हळद दळून आणणे,
ज्येष्ठांसाठी आल्याची सूंठ बनवून ठेवणे.
देव्हाऱ्या समोरच्या करंड्यात लागणारी हळद-कुंकू, वर्षभराच्या
लागणाऱ्या फुलवाती-तेलवाती, त्यासाठी लागणार कापूस, हेही सगळं मुबलक.
अगदी साध्यातलं साधं कुटूंब असलं
तरी त्यांच्याकडे धान्याची कमतरता नसायची. पूर्वीच्या काळात श्रीमंती ची व्याख्याच वेगळी
होती. घरात धन-धान्य,
दूध-दुभतं, हासती-खेळती पोरं, गुरं-ढोरं, बैलगाडी,
काळ्या रात्रीला हाक मारली तरी
अडचणीला धावून येणारी माणसं आणि १२ महिने
येणाऱ्या पै-पाहुण्यांचा अगदी
मनापासून पाहुणचार... तोही अगदी आग्रहाने
जेऊ-खाऊ घालून आणि
वर पुढच्या प्रवासाला जाताना कांदा-भाकरी बांधून देऊन त्याची पाठवणी.
हे सगळं ज्या घरी
व्हायचं ते घर आणि
ती माणसं श्रीमंत. मनाने आणि औदार्याने.
गौरी-गणपती च्या वेळी.. बायका
गौरीच्या प्रतिष्ठापनेला म्हणतात ना.... आलीस का गौराई?
आले गं बाई... कशाच्या
पायी? धन-धान्याच्या पायी,
सुख-समृद्धीच्या पायी, भाजी-भाकरीच्या पायी,
हळदी-कुंकुवाच्या पायी, गाई-वासरांच्या पायी,
मुला-बाळांच्या पायी.. म्हणजे लक्ष्मीनं आपल्या घरी यावं तर
ह्या सगळ्यांच्या रूपानं यावं... म्हणजे हे सगळं घरी
आलं किंवा असलं कि आपल्या
घरी लक्ष्मी आली, श्रीमंती आली..... एवढं
सगळं नाही पण निदान
२ वेळचं जेवण, अंगभर कपडे आणि डोक्यावर
छत असलं तरी लोक
आनंदी असायची आणि स्वाभिमानानं, ताठ
मानेनं जगायची.
कालांतराने
बायका गौराईला सांगू लागल्या कि, हिऱ्या-मोत्यांच्या
पावलांनी ये, सोन्या-नाण्यांच्या
पावलांनी ये, गाड्या-घोड्यांच्या
पावलांनी ये, धन-संपत्तीच्या
पावलांनी ये, जमीन-जुमल्याच्या
पावलांनी ये, आणि लक्ष्मी
घरी येण्याची, म्हणजेच घरात "लक्ष्मी" असण्याची हि लीस्ट पुढे
वाढतच गेली. आणि आज-तागायत
ती वाढतेच आहे. माणूस थांबायचं
म्हणून नावच घेत नाहीये.
धान्याच्या मोबदल्यात थोडा पैसा मिळाला
तरी शेतकरी सुखावला जायचा. कधी पाऊसकाळ कमी
झाला तर धान्य कमी
व्हायचं, कधी चांगला झाला
तर धान्य मुबलक व्हायचं. गावा-गावात १२
बलुतेदार असायचे, वेगवेगळे व्यवसाय वाले.... सणावाराला धंदे चांगले व्हायचे,
लग्न-सराई आली, यात्रा
आल्या, दसरा-दिवाळी आली
कि पैसा चांगला मिळायचा.
पण तेच सुगीचे दिवस
आले, पावसाळ्याचे दिवस आले, किंवा
एखाद्या साली दुष्काळ आला
कि धंदे थंड पडायचे.
म्हणजे धंद्यात चढ-उतार असायचा.
आणि हे ज्या-त्या
व्यावसायिकाला माहीत असायचं.. त्याप्रमाणं तो त्या त्या
वर्षी किंवा तशा कठीण परिस्थितीत
सुद्धा आपलं घर चालवायला
खंबीर असायचा. कारण माहितेय? कारण
त्याने तशी आधीच तजबीज
केलेली असायची. ४ पैसे गाठीला
बांधून ठेवायची सवय होती त्या
लोकांना. माहित असायचं कि, ना जाणो
एखाद वर्ष दुष्काळाचं आलं
तर बाबा आपण जपून
असावं.... मग
थोडा काळ बदलला आणि
थोडीफार शिकलेली लोकं सरकारी नोकरी,
शाळा-मास्तर, कचेरी, हातमाग, अशा छोट्या मोठ्या
नोकऱ्या करु लागली...
तरी पण माणसं पैसा
राखून असायची, आणि पैसा हाती
आला तरी जमिनीवर असायची.
कालांतरानं कंपन्या, बँका, शाळा, सगळं वाढत गेलं
आणि शेती करणारा, छोटा-मोठा व्यवसाय करणारा
बलुतेदार सुद्धा नोकऱ्या करु लागला. औद्योगिकरण
आलं, शहरीकरण झालं.. आणि
सुरु झालं मग एक
चाकोरीबध्द जीवन!.. माणसानं
स्वतःच्या श्रीमंतीच्या व्याख्याच बदलून टाकल्या. जिथं एके काळी,
श्रीमंती म्हणजे... थोडी-फार संपत्ती,
पण खूप सारं औदार्य,
दानत, मोठं मन, दुसऱ्यां-प्रति आदर अशी व्याख्या
होती... तिथं आज माणूस
श्रीमंती मोजताना बंगला, जमिनी, कार-गाड्या, नोकर-चाकर .... अहो पण ही
तुमची दौलत झाली हो!
यात श्रीमंती कुठे आली? आजकाल
तर जो-तो भारीतले
कपडे, इंपोर्टेड गॉगल्स, किंमती घड्याळं, ब्रँडेड बूट, ब्रँडेड मोबाईल,
ऑनलाईन शॉपिंग, विंडो शॉपिंग, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची तर रेलचेल झालीय
घरा-घरांतून.. नुसती स्पर्धा लागलीये जणू.. कोणी काही वेगळं,
भारीतलं घेतलं कि आपल्याकडेही ते
आलंच पाहिजे, मग त्याची गरज
असो वा नसो......
नाही, मी कोणालाही दोष
देत नाहीये. एकंदर जमानाच बदललाय. हल्ली लोकांची मानसिकताच बदललीय. शहरात तर झालीच आहे
पण खेड्यातूनही झालीये. मग ह्या नवीन
श्रीमंतीच्या व्याख्येतील तो बंगला, तो
फ्लॅट, ती गाडी, टीव्ही,
फ्रिज, एसी, हे सगळं
खिशातल्या पैशांचं रोखीने घेतलेलं असो किंवा बँकांच्या
जीवावर घेतलेलं असो. पण शेजाऱ्याकडे
आहे ना? मग ते
आपल्याकडेही असलंच पाहिजे. त्याची गरज आहे कि
नाही हा वेगळाच मुद्दा!
मला
लहानपणी आमच्या वडिलांनी एक गोष्ट सांगितलेली
आठवते. गरज आणि हौस
या दोन्हीतल्या फरकाची. गरज कशाला म्हणायची
आणि हौस कशाला म्हणायची.
गरज भागवायला गरजेपुरताच पैसा लागतो आणि
हौस भागवायला पैसा कधीच पुरत
नाही. कारण हौस हि
अशी गोष्ट आहे कि ती
पूर्णच होत नाही. झालीच तरी मन मात्र
भरत नाही. अजून हे घेऊ
अजून ते घेऊ चा
पाढा संपत नाही... थांबतच
नाही माणूस. जो माणूस हौसेवर
नियंत्रण मिळवतो ना, तो माणूस
कधीच कर्जबाजारी होत नाही. ना
त्याच्यावर कधी पश्चातापाची वेळ
येते. आप्पा सांगायचे कि ज्या गोष्टीची
"गरज" आहे तिथं निश्चितच
पैसा जाऊ द्यावा. आणि
खिशात पैसा असेल तरच
"हौस" करावी. म्हणजे थोडक्यात काय.... हौसेसाठी, रोख पैशाने जे
विकत घेता येईल, त्याच
हौसेचं स्वप्न बघावं आणि तीच हौस
भागवावी. ऐपत नसेल किंवा
खिशात पैसा नसेल तर
त्या वस्तूच्या भानगडीतच पडू नये. आजकाल
माणसाला हेच कळेना झालंय.
गरज आणि हौस यामधल्या
फरकामध्येच तो गल्लत करून
बसला आणि त्याचा सगळा
प्लॅन फसला. पूर्वी लोकं कर्ज मिळण्यासाठी
बँकांची दारं पिटायची, आजकाल
तर तेही सोपं झालंय
.. रोज माणसांनाच समोरुन फोन येतात कर्ज
हवंय का म्हणून. बर
हफ्ते भरायला आता कुठे बँकेत
जावं लागतं? "ई सी एस".
म्हणजे एक फॉर्म भरला
कि आपोआप तुमच्या खात्यातून हफ्त्याचे पैसे वजा होत
जातात. मग काय लोकांनीही
सहज-सहजी मिळणाऱ्या कर्जांवर
हवी ती कागदपत्रं देऊन
डल्ला मारला. घरं घेतली, गाड्या
घेतल्या, सोनं-नाणं घेतलं,
महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतल्या, व्यावसायिकांनी दुकानांमध्ये गच्च माल भरुन
ठेवला. आणि हीच जीवनशैली
भारतात आजकाल सगळीकडे सुरु आहे. आली
हौस मनात, घे बँकेच्या जीवावर
गाडी, आवडला नवीन मोबाईल, घे
हफ्त्यावर मोबाईल....
मी वरती बोललो ना...
चाकोरीबद्ध जीवन!... म्हणजे, तेवढाच पगार, त्यातला एवढा घराच्या कर्जाचा
हफ्ता, तेवढा गाडीचा हफ्ता, एवढी पोरांची फी,
तेवढा कामवालीचा पगार, एवढं दुधाचं बील,
तेवढं किराणा , एवढं पेट्रोलचं, तेवढं
भाजीपाल्याचं ... कोलूच्या बैलासारखं आपण नुसतं रोज
पळतो आणि आलेला पैसा
अगदी व्यवस्थित संपवतो. हो! अक्षरशः संपवतोच.
कारण आपल्याला माहितेय ना..... परत १ तारीख
येतेचंय की... पुढचा पगार येतोचंय.. काय
आडणारे तेव्हा? एक लोन संपतंय,
तोवर लाईन मध्ये दुसरी
वस्तू प्लॅन करून ठेवलीच आहे
लोन वर उचलायला. टीव्ही
चा हफ्ता संपला कि वॉशिंग मशीन
घेऊ हफ्त्यावर. त्याचा हफ्ता संपला, आता फ्रिज घेऊ
हफ्त्यावर... हौस काही संपत
नाही. आणि ह्या सगळ्या
हौसा भागवता भागवता माणूस भविष्याची गोळा-बेरीज करायलाच
विसरला. वेळच्या वेळी गलेलठ्ठ पगार सुरूय ना..
लोकं मोठ-मोठ्या घरांचे,
किमती गाड्यांचे, जमिनींचे बिनधास्त व्यवहार करु लागले आणि
ठरलेल्या प्लॅन प्रमाणे वेळच्या वेळी त्या पगारातून
बँकांचे हफ्ते जाऊ लागले. हा
जो ठरलेला प्लॅन असतो ना आपल्या
डोक्यात. हा प्लॅन आपला
मेंदू आपल्या चाकोरीबद्ध लाईफ-स्टाईलने बनवतो.
तो कधी विचारच करत
नाही कि, त्या चाकोरीवरून
चाक घसरलं तर आपली गाडी
डगमगेल, पडेल, आपटेल. जेव्हा दुष्काळ येतो ना, तेव्हा
त्यात शेतकरी अडकतो, कधी महापूर येतो
तेव्हा शेतकऱ्याबरोबर थोडाफार व्यावसायिक वर्ग सुद्धा अशात
अडकतो. कधी मंदी येते
ना तेव्हा शेअर मार्केट ला
पैसा लावणारा आणि गलेलठ्ठ पगाराच्या
नोकऱ्या करणारा सुद्धा अशात अडकतो. आणि
अचानक येणाऱ्या अशा संकटाचा सामना
करता करता मग माणसाच्या
तोंडाला फेस येतो. पैशांची
जमवाजमव करताना, देणी फेडताना, बँकांचे
थकलेले हफ्ते जास्तीच्या व्याजासकट फेडताना खरी कसरत सुरु
होते. आणि ह्या सगळ्यातून
संसाराचा गाडा चालवायचा, म्हणजे
हवालदीलच. अगदी रडकुंडीला येतो
माणूस. अशा वेळी तर
पाहुणा-रावळा पण फोन उचलत
नाही. आणि त्याने तो
उचलू पण नये. कारण
हौस तुम्ही करताय. त्याला विचारून केलीत का? मग त्याला
का दोष द्यावा तुम्ही?
सांगण्याचं तात्पर्य हे कि लोकं
आजकाल फक्त एक च
प्लॅन करतात आणि त्यांना वाटतं
कि आपण ठरवलंय त्याप्रमाणेच
सगळं होणार आहे. आणि इथेच
माणूस फसतो.
एक एकदम साधं उदाहरण
देतो. पुण्यावरून कोकणात जायचंय तुम्हाला. जोराचा वादळी पाऊस होऊन गेलाय.
आणि कुठला घाट-रस्ता सुरुय,
कुठला नाही हे तुम्हाला
माहीत नाही. पण जायचंय हे
तर नक्की. तुम्ही प्लॅन केला कि ताम्हिणी
घाट मार्गे जायचंय. आणि थोडं पुढे
गेल्यावर कळतंय कि इकडे अतिवृष्टीमुळे
एक दरड कोसळलीये आणि
रस्ता बंद आहे. मग
पुढे काय? तुम्ही जाणं
रद्द करणार? काय करणार? भोर
मार्गे जाल, महाबळेश्वर मार्गे
जाल. म्हणजे दुसरा उपाय मनात हेरून
ठेवला आहातच ना तुम्ही?
तसा
तर मी सुद्धा एक
नोकरदारच! एक आय.टी.
वाला. आम्हालाही प्रॉग्रॅमिंग करताना मोठे मोठे कोड
लिहावे लागतात. ते लिहिताना डोक्याची
अक्षरशः मंडई होते. आणखी
एक उदाहरण देतो... समजा माझा क्लाईंट
एक नावाजलेली बँक आहे. आणि
त्या बँकेचा मास्टर डेटा मी मॉडीफाय
करण्याचा प्लॅन केला आहे. त्यासाठी
लिहिलेला प्रोग्रॅम हा काही सेकंदात
लाखो कस्टमरचा डेटा बदलणार आहे.
हा झाला मी मनात
बनवलेला माझा प्लॅन. त्याला
मी नाव दिलं "प्लॅन
ए". (म्हणजे आपण मनात एखादी
गोष्ट आल्या आल्या जो पटकन मनात
बनवतो.) पण तो प्रोग्रॅम
जर ठरल्याप्रमाणे नाही चालला, आणि
जर काही गल्लत झाली
तर नोकरीवर गदा, हे नक्की.
त्यासाठी आम्ही आधीच एक वेगळा
प्रोग्रॅम तयार करून त्या
डेटा चा बॅकअप घेऊन
ठेवलेला असतो ज्यातून आम्ही
तो मास्टर डेटा, आहे तसा परत
रिस्टोर करु शकतो. आणि
ह्या पर्यायाला आम्ही आय. टी. वाले
म्हणतो "प्लॅन बी". खरं पाहता ही
संकल्पना आय. टी. मधून
सुरु झाली आणि आज-कालच्या मॅनेजमेंट सेशन्स मध्ये ह्या "प्लॅन बी" बद्दल शिकवलं जातं. आणि आता कोणत्याही
निर्णयात "प्लॅन बी" तयार असणं ही
सगळ्या कंपन्यांची पॉलिसी झाली आहे. म्हणजे
नेमकं काय? तर ठरल्याप्रमाणे
एखादी गोष्ट नाहीच झाली तर आपल्याकडे
त्यावर दुसरा उपाय तयार पाहिजेच.
कि जेणेकरून आपली ऐन वेळी
पंचायत व्हायला नको.
खरं
तर ही चाकोरीबद्ध जीवनशैली
आणि ठराविक पगाराची पूर्ण पणे प्लॅन करुन
विल्हेवाट लावणारी ही पिढी, आपलीच.
अलीकडच्या २०-२५ वर्षातली
आपण कमावती लोकंच ह्या सगळ्याला बळी
पडत चाललो आहोत. महिन्याला ठराविक होणारा इन्कम, त्यातून हा एवढा खर्च
ह्यासाठी, तो खर्च त्यासाठी,
कर्जाचा अमुक एक हफ्ता,
गाडीचा तमुक एवढा हफ्ता,
स्कुल फीज एवढी... आणि
महिन्याच्या शेवटी हातात काय? तर पुढच्या
पगाराची वाट पाहत बसणे.
हेच काल-चक्र सुरु
आहे सगळीकडे. कधी विचार केलात?
कि अचानक एक-दोन महिन्याचा
पगार थांबला तर काय वेळ
येईल? कशी फजिती होईल?
त्या साठी आपल्याकडे आपला
"प्लॅन बी" तयार आहे का?
कधी विचारलंत स्वतःला?
ह्या
२-३ महिन्यात कोरोना
सारख्या ह्या महारोगाने थैमान
काय घातलं आणि माणसाचे खाड्कन
डोळेच उघडले. हातावर पोट असलेले गरीब
लोक अक्षरशः रस्त्यावर आलेत. रोजचे रोज ४ पैसे
कमवून आणून घर चालवणारे,
आपलं सर्वस्व हिरावल्यासारखं झालेत. हमाली करणारे, घर-काम करणाऱ्या
बायका, रोजंदारीचे गडी, गाडा वाले,
रिक्षावाले, पान-टपरीवाले, चहावाले,
ड्राईव्हर, छोटे-छोटे व्यावसायिक,
सगळे दुकानदार, मोठे व्यावसायिक, कारखानदार
अगदी सगळे सगळे रडकुंडीला
आलेत. पैजेला लावलेल्या पैशा सारखी झालीय
व्यावसायिकांची अवस्था. हरतील का जिंकतील, रडतील
का तारतील हे देव जाणे.
कोणाचा माल एक्सपायर झाला,
कोणाचा कुजून गेला, कोणाचा किती लॉस झाला,
कोण कितीला डुबला काही त्याला सीमाच
नाहीय. बऱ्याचश्या खाजगी नोकरदारांचे पगार च झाले
नाहीत, कोणाचे अर्धेच झाले, कोणाला फक्त बेसिकच मिळाला
तर कोणाला कामावरून काढून टाकलं. खूप जणांनी नोकऱ्या
गमावल्या, तर खूप जणांनी
धंदे. आणि ह्या वैश्विक
संकटातून फक्त तोच तारुन
निघाला ज्याच्याकडे त्याचा "प्लॅन बी" रेडी होता. ज्याने
४ पैसे गाठीला बांधून
ठेवलेले, ज्याने नोकरी गेली तर दुसरीकडे
व्यवसायाची तयारी केलेली, ज्याने एक व्यवसाय बंद
पडला तर डगमगून न
जाता दुसरा व्यवसाय उभा करण्याचा प्लॅन
केलेला, ज्या कामवालीचं एक
काम गेलं तर तीने
दुसरीकडे शब्द टाकून ठेवलेला.
किंवा आता असं म्हणूया
कि... ज्याचा धंदा-नोकरी बंद
झाला आणि इन्कम पूर्णपणे
थांबला पण ४ पैसे
साठवून ते सुरक्षित ठेवलेले
म्हणून तो ३-४
महिने जगला, खाऊ-पिऊ शकला....
किंवा असं म्हणूया कि...
पगार नाही मिळाला तरी
ज्याने फिक्स डिपॉजिट ला रक्कम ठेवलेली
तो त्याच्या गाडीचे, घराचे हफ्ते भरु शकला. आणि
हे सगळे लोकं आहेत
ते "प्लॅन बी" चा विचार करून
ठेवणारे.
जरा
विचार करा.. ही "प्लॅन बी" ची संकल्पना खरंच
परदेशातून आली असेल का
हो? काय वाटतंय तुम्हाला?
भले त्याला नाव असेल "प्लॅन
बी". पण आपल्या पूर्वजांनी, आजोबा, पणजोबांनी जी विचारसरणी आणि
साठवणूक करण्याची सवय घरादाराला लावली
होती तीला काय म्हणाल
मग? कोणी बदलवले आपले
खरे आचार, आपले संस्कार, आपले
विचार, आपली जगण्याची पद्धत?
आधीच्या लोकांनी कणग्या भरून केलेला धान्याचा
साठा, पत्र्याच्या डब्यांमधून वर्षभराची केलेली कडधान्याची साठवण, घरची गुरं-ढोरं,
दूध-दुभतं हे जर आत्ताही
आपण करत असतो तर
आज कोरोना मुळे बंद असल्यावर
किराणा साठी तास-तासभर
लायनीत उभं राहिलो असतो?
ह्याला-त्याला कडधांन्य मागत बसावं लागलं
असतं? पूर्वी पितळेचे, तांब्याचे, जर्मनचे मोठ-मोठे डबेच्या
डबे भरून वर्षभर पुरतील
एवढं धान्य घरात असायचं. कोणी
सुरु केले स्टीलचे छोटे
छोटे डबे वापरायला? कोणी
सुरु केले प्लास्टिकची टीचभर
भांडी वापरायला? एका महिन्याचं पण
सामान नीट मावत नाही
असल्या खेळण्यातल्या भांड्यांमध्ये. कोणी बदललं हे
सगळं? आपण नवीन पिढीतल्यांनीच
ना? भोगावं कोणाला लागलं? आपल्यालाच ना? आज जर
घरात ज्वारीने भरलेली कणगी असती, कडधान्यांनी
भरलेले डबे असते आणि
घरच्या घाण्याच्या तेलाचा डबा भरलेला आहे
असा माहित असतं ना? तर
कोरोना सारखे आणखी १० रोग
पण आपण हिम्मतीने लढलो
असतो. फिक्स डिपॉजिट मध्ये ठेवलेले, घरात धान्याच्या डब्यात
ठेवलेले, ४ पैसे आज
राखीव मध्ये असते, तर न डगमगता बँकेचे हफ्ते पण थकून दिले
नसते. एक कोरोना आला
आणि आपल्याला डोक्याला हात लावून बसायची
वेळ आणून गेला. अहो,
आपल्या जुन्या पिढीतल्या लोकांनी असे साथीचे खूप
रोग आणि बंद पाळलेत,
पचवलेत आणि त्यातून ते
तारून निघालेत. ना त्यावेळी सैनिटायझर
होतं, ना पी.पी.इ. कीट आई
आणि ना मास्क. त्यावेळी
एकच तंत्र होतं .... हातचा राखून कसल्याही परिस्थितीला तोंड देता यावं
अशी १२ महिने तयारी.
थोडक्यात काय? तर आपली
जुनी लोकं "हातचा" राखून असायची. अगदी कसलीही वाईट
वेळ पचवून न्यायची त्यांची १२ महिने १८
काळ तयारी असायची. आपण मधल्या कित्त्येक
वर्षात आपली लाईफ स्टाईल
बदललीय. आणि फक्त रोजचा
दिवस कसा ढकलता येईल
एवढंच बघतोय. एक चाकोरीबद्ध जीवन
सुरूय.
थोडंफार
बदलुयात आपल्या पिढीनं. गरज आणि हौस
यातला फरक जाणूयात. पूर्वजांचा
आदर्श घेणं गरजेचं आहे
आता तरी. त्यांनी घालून
दिलेल्या सवयी, पद्धती, पायंडा, आपल्याकडे थोडं एक्सट्रा असण्याची
सवय, ४ पैसे गाठीला
बांधून ठेवण्याची सवय, धान्याची साठवणूक,
वस्तूंची जपणूक, आदर्शांची जपणूक, विचारांची जपणूक.... खरंच!... आपण
धावत्या पाठीमागे धावण्याच्या नादात खूप काही मागे
सोडून आलोय. पूर्वजांच्या संस्कारांची शिदोरी बरोबर वागवायचा कंटाळा
केल्यामुळे खूप काही चुकल्यासारखं
वाटतंय. असो.
पुन्हा एकदा सांगतो, कोणत्याही
वाईट घडीला आपण आपल्या "प्लॅन
बी" सहीत लढवय्या सारखं
खंबीरपणे पाय रोवून उभं
असा. मनाने स्वस्थ रहा. शरीराने तंदुरुस्त
रहा. विचारांनी धीट रहा. तब्येतीने
गुटगुटीत राहा.. मग कोरोनाच काय..
त्याचा बाप आला तरी
त्यातून तारून जायची क्षमता तुमच्यात आपोआप येईल, हे नक्की! काळजी
घ्या, सुरक्षित रहा.
-
श्री. पंकज द्वारकानाथ मोहोटकर
लेख लिहिलेली तारीख: २९ मे २०२०
ठिकाण: यशश्री, कात्रज, पुणे.