बुधवार, १५ मार्च, २०२३

चव

 

डिश मधील चिवडा खाऊन झाल्यावर खाली उरणारा मसाला असतो ना ... जिरे-मोहरी, मिरची, कडीपत्ता, लसूण .... टाकून देतो आपणचिवडा तर खाऊन झालेला असतो ना… पण ज्याच्यामुळे तो चिवडा चविष्ट झालेला असतो तो मसाला? …. कडवट असतो ना?... मग काय करतो आपण तो मसाला? …. खरं तर त्यानेच त्या भाजक्या पोह्यांना चिवड्याचं रुप दिलेलं असतं, चव दिलेली असते…….

आपलं सुद्धा काहीसं तसंच असतं!…. आपलं आयुष्य आपण एन्जॉय करुन घेत असतो. आणि आपल्या घरात, आसपास सुद्धा अशीच काही शिल्लक उरलेली माणसं असतात. ज्यांचं बोलणं, वागणं, दटावणं, रागावणं आपल्याला त्या शेवटी उरलेल्या खारट मसाल्या सारखं वाटतं. तिखट.. खारट... पण खरं पाहता घरा-दाराला पुढं आणणारी, रंग- रुप आणणारी हीच मुख्य माणसं असतात. त्यांच्यामुळेच आपल्या घराला घरपण असतंआणि आयुष्याला चव...!

बालपण

 बा

 

च्यावम्याव च्यावम्याव पक्कालीचं पाणी प्याव

पुन्हा एकदा ते बालपण जगुयात ना राव.

 

गल्लीतल्या मित्रांसह मांडू चिंचोक्यांचा डाव

मनसोक्त भटकू आणता अभ्यासाचा आव.

 

विटी-दांडू, क्रिकेट असो वा असो लगोरीचा डाव

नाहीतर चिखला मातीत खेळु कुस्त्यांचा डाव.

 

विष-अमृत, सुरपाट्या, अन खेळू गल्लीतला लपंडाव

मोबाईल-टीव्हीच्या युगात शोधू मातीतला माझा गाव.

 

च्यावम्याव च्यावम्याव पक्कालीचं पाणी प्याव

पुन्हा एकदा ते बालपण जगुयात ना राव.

 

ऊन-पावसात खेळताना कधीच नव्हता मनाला ठाव

पडू दे रे मित्रा अंधार, तू अजून एक गोट्यांचा लाव डाव.

 

आकडणाऱ्या धन-दांडग्यांना देऊ नको भाव

उडू दे ठिणग्या तू आणखी लवंगी फटाके लाव. 

 

वर्गणी काढून आपण खाऊ मनसोक्त वडापाव

हासडु शिव्या पुन्हा एकदा घेऊन बापाचं नाव.

 

च्यावम्याव च्यावम्याव पक्कालीचं पाणी प्याव

पुन्हा एकदा ते बालपण जगुयात ना राव.

 

काट्याकुट्यात शोधून चिंचा-बोरं-आवळ्यांचा वाटा आणावा

रानीवनी फिरुन घेऊ मधाच्या पोळ्यांचा सुगावा.

 

कागदाच्या होड्या अन पावसाचा ओलावा

चिंब भिजून रानी-वनी गाव पुन्हा पहावा.

 

नदीत उड्या मारण्याचा आनंद पुन्हा एकदा घ्यावा

अन अंगणातल्या मातीचा स्पर्श मनाला सुखावा.

 

च्यावम्याव च्यावम्याव पक्कालीचं पाणी प्याव

पुन्हा एकदा ते बालपण जगुयात ना राव.

 

 

 

चड्डीच्या खिशाला उकडक्या शेंगांची भर असायची

जेवणानंतर रात्री मनसोक्त गप्पांची मैफील रंगायची.

 

एक-एक रुपयांच्या वर्गणीत भेळ पार्टी व्हायची

आता किंमत कळते मित्रांत वाटून घेऊन खायची.

 

अनवाणी गावभर फिरताना जीवाला उसंत नसायची

आता ब्रँडेड बूटालाही सर नाही त्या उनाड पावलांची.

 

च्यावम्याव च्यावम्याव पक्कालीचं पाणी प्याव

पुन्हा एकदा ते बालपण जगुयात ना राव.

 

लहानपणी लावलेलं रोपटं उंच आभाळी जावं

आता सावली देताना मनात घर करुन रहावं.

 

रुतु दे काटे पायात पण उनाड पळत सुटावं

समजदारीच्या या जगात पुन्हा स्वच्छंदी व्हावं.

 

असं वाटतं बालपण पुन्हा एकदा यावं,

पोक्तपणाच्या आयुष्यात पुन्हा खेळकर व्हावं.

 

च्यावम्याव च्यावम्याव पक्कालीचं पाणी प्याव

पुन्हा एकदा ते बालपण जगुयात ना राव.

 

-=@ पंकज द्वारकानाथ मोहोटकर @=-

   ९ मार्च २०२१  कात्रज, पुणे.