बुधवार, २० एप्रिल, २०११

|| वारकरी - सांप्रदाय ||



माझा जन्मच वारकरी कुटुंबातला. आम्ही वैष्णव धर्मीय..... पंढरी च्या विठुरायाचे भक्त. विष्णू चा अवतार श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाचा अवतार म्हणजेच आमचा पंढरीराया - विठूराया - पांडुरंग. आणि ह्या विठूरायाची लाडकी लेकरं म्हणजेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत मुक्ताबाईसंत चोखामेळा. यापैकीच एक असलेल्या श्री संत शिरोमणी  नामदेव महाराजांनी स्थापन केलेल्या शिंपी समाजाचे आम्ही प्रसारक. 
सर्व संतांच्या मुकुटातील मध्यभागी असलेल्या, तेजाची झळाळी असलेल्या "शिरोमणी" ची उपाधी सर्व महाराष्ट्रातील विठ्ठल भक्तांनी आणि संतांनीसंत नामदेवांना दिली. संत नामदेव महाराजांचा जन्म आपल्या इंग्रजी तारखेप्रमाणे २९ ऑक्टोबर १२७० रोजी हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी या गावी दामाशेठ आणि गोणाबाई या शिंपीकाम करणाऱ्या दाम्पत्याच्या पोटी झाला. संत नामदेव महाराज, त्यांचे अभंग, त्यांची कीर्तने, हि जगप्रसिद्ध आहेत. फक्त महाराष्ट्रातच नाही तर उभ्या भारत वर्षामध्ये त्यांनी इतर संतांबरोबर भागवत धर्माचा प्रसार केला. आपल्या अभंगांची, कीर्तनांची आणि भागवत धर्माची संस्कृती रुजवली. पंजाब प्रांतातील, गुरुदासपूर जिल्ह्यामध्ये घुमान या ठिकाणी अजून हि त्यांचं मंदिर आहे, नामदेवांचं तिथलं वास्तव्य २० वर्षांचं होतं. शीख लोकांच्या "गुरु ग्रंथ साहिब" मध्ये  १५ संतांच्या उल्लेखांमध्ये आजही संत नामदेवांचं नाव आहे. नामदेवांचे अभंगसंतवाणीकीर्तने आजही विठ्ठलमय करून जातात. संत नामदेवांच्या अभंगांची, संतावाणींची आणि तीर्थवाच असलेली नामदेवांची "गाथा"  आजही तितकीच गोड आहे. हे झालं आमच्या धर्माची नांदी रुजवणाऱ्या संत नामदेवांबद्दल. आणि अशा संत नामदेव शिंपी समाजातील एका कुटुंबामधील माझा जन्म आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. 
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई.... अशा थोर संतांची संस्कृती सांगणाऱ्या महाराष्ट्रातील, संतांच्या भूमीतील आपण सारी लेकरे.

|| ते वाट कृपेची करी तू ते दिशा स्नेहेची भरी तू
जीवातळी आन्धुरे तू,  आपला जीव ||


असा आहे संतांचा सर्वाकृती कळवळा. पंढरीच्या विठ्ठलाचा नाम-गजर करत करत प्रेम भक्तीचा सोपा मार्ग या कृपावंतांनी महाराष्ट्राला दाखवला. ज्ञानेश्वर माउलींनी या वाटेवर अमृताचा सडा शिंपला आहे. यज्ञ-याग नको, जप-ताप नको, षोड-शोपचारांची पूजा देखील नको. नुसतं देवाचं नामस्मरण केलंत तरी मोक्षाचा मार्ग सोपा होईल हि शिकवण आपल्याला ज्ञानदेवांनी दिली. || कलियुगे उद्धार हरीच्या नामे || असं संत तुकारामांनीही म्हटलेलं आहे. देवाचं नाव उच्चारायचे देखील श्रम नको असले तरी चालेल. पण आपला देह, मन, बुद्धी, आत्मा, सारांश, आपलं सारं काही ईश्वरार्पण समझुन देवाच्या दारी क्षणभर जरी उभे राहाल ना, अरे एवढी साधना झाली तरी पुरे आहे. ती विठाई माउली तुमचं बोट धरून तुम्हाला मुक्तीसोपानावर घेऊन जाईल.  हे आश्वासन देण्याकरता ज्ञानदेव म्हणाले,

|| देवाचिये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्ती चारी साधियेल्या ||

वारकरी सांप्रदाय म्हणजे नेमकं काय?
विठूरायाची मनोभावे भक्ती - देवावरची अपार श्रद्धापंढरी रायाच्या चरणी नतमस्तक होऊन केलेल्या शीर साष्टांग दंडवताचा  आनंद, एकादशीचा उपवास, अखंड हरीनाम, नित्याने वाचला गेलेला हरिपाठपंढरीची वारी, आळंदीला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच दर्शन, ज्येष्ठांपुढे साष्टांग दंडवतदुसऱ्याचा पाय चुकून लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार, गुरुजनांचा आदरनियमित देव-पूजातिन्ही-सांजेला देवापुढे लावलेला दिवा, परगावावरून आल्यावर आणि परगावी जाताना आई-वडिलांना केलेला साष्टांग नमस्कारकोणीतरी गावी चाललंय म्हणून आईने समईची पेटविलेली वातहातून काही चूक घडली तर डोळे मिटून "देवा मला माफ कर" ही प्रामाणिकपणे मान्य केलेली चूक, अंघोळीचा तांब्या भरून डोक्यावर ओतून घेताच सुरु केलेली "जय हनुमान ज्ञान-गुण-सागर..." ही  हनुमान-चालीसा, आंघोळीनंतर देवापुढे नत-मस्तक होऊन म्हटलेलं "साष्टांग नमन हे माझे" हे गणपती-स्तोत्र आजी-आजोबांची पाय दाबून देऊन केलेली सेवा आणि आजी-आजोबांनी शिकवलेलं "दिव्या दिव्या दिपत्कार, कानन कुंडल मोतीहार", आपल्या चाली-रिती, आपली परंपरा, आपली संस्कृती, समोरच्या व्यक्तीबद्दल आदर इतरांबद्दल प्रेम, इतरांच्या दुर्गुणांकडे दुर्लक्ष आणि सद्गुणांच अलोखन, आधी देवाला नैवेध्य, तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्न न घेणे कधीही कोणाचं वाईट न चिंतने, चांगल्या गोष्टींचं आचरण, वाईट गोष्टींपासून परावृत्ती, जात-पात भेदभाव न करणंखाण्या-पिण्याचं म्हणाल तर शुद्ध शाकाहार - तंबाखू, मध्यपान, मांसाहार न करणे, स्वच्छ विचार, दुसऱ्याची निंदा-नालस्ती न करणे.....  थोडक्यात काय तर ज्या ज्या गोष्टींनी आपल्याला पुण्य मिळेल त्या त्या सगळ्या चांगल्या गोष्टींचं आचरण म्हणजे च वारकरी-सांप्रदाय.

तर अशा वारकरी-सांप्रदायिक कुटुंबातील वै. रघुनाथ विष्णूशेठ मोहोटकर (माझे आजोबा) यां सारख्या उधार आणि मोठ्या मनाच्या माणसा घरी मी जन्मलो. माझे आजोबा म्हणजे खूप great person होते. आम्ही त्यांना दादा म्हणत. त्यांचे १ लहान भाऊ होते... वै. एकनाथ विष्णूशेठ मोहोटकर. हे माझ्या आजोबांना तेव्हा 'दादा' म्हणत. त्यामुळे मग आमच्या आजोबांची मुलं म्हणजेच माझे वडील, चुलते, आत्या  हे सगळे त्यांना पुढे 'दादा' च म्हणू लागले आणि मग आम्ही नातवंडही. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खातगुण गावचा... म्हणजेच त्यांच्या आजोळचा. त्यांचा जन्म २३/११/१९०४ चा. बालपणीच आईचं छत्र हरवल्यामुळे, त्यांच्या मामांनी त्यांना वाढवलं आणि व्यवसायाचे धडे दिले. आम्ही जातीनेच शिंपी असल्यामुळे पहिल्यापासूनच आमचा कापड व्यवसाय. त्या काळच्या रेशमी, जरी, सुती आणि हातमागाच्या कापडांचे मोठे मोठे गठले घेऊन ते घोड्याच्या पाठीवर बांधायचे आणि गावोगाव च्या बाजाराला ते विकण्यासाठी फिरायचे हाच त्यांचा दिनक्रम. आमचा पूर्ण भाग, वाई, पाचवड, भुईंजकोरेगाव, भाडळे, विखळेदहीगाव आणि आजू-बाजूच्या १०-१५ वाड्या वस्त्या अशी त्यांची त्या काळी घोड्यावरून फिरती असायची. ४ पैसे गाठीला बांधून मग आणखी माल वाढवायचा, तो विकायचा, बाजाराची फिरती आणखी वाढवायची आणि असाच व्यवसाय वाढवत राहायचं. नंतर मग त्यांनी 'पुसेगाव' या खटाव तालुक्यामधील गावामध्ये मध्ये जागा घेतली, तिथे घर घेतलं, दुकान साठी जागा घेतली, शेती घेतली. हे 'पुसेगाव' म्हणजे खातगुण पासून जवळ आणि कोरेगाव-पंढरपूर रस्त्यावरच व्यापाराचं मोठा ठिकाण. कोरेगाव-पुसेगाव म्हणजे १२-१३ मैलाचं अंतर.  कोरेगाव हे आमच्या तालुक्याचं ठिकाण असल्यानं त्यांचा बाजार चा व्यवसाय तिकडे ही बाजारच्या दिवशी जोमाने चालायचा. त्या काळी कापड सुद्धा रेशन कार्ड वर मिळत असे. कोरेगाव तालुक्यामध्ये जेव्हा रेशन वरती कापड विक्री सुरु झाली तेव्हा ह्या दोघा भावांनी कापड विक्रीचं रेशन लायीसेन्स मिळवलं. आणि पुढे 'पिंपोडे बुद्रुक' या आमच्या मूळ गावी वडिलांच्या शिवण-कामाच्या दुकानाबरोबर  त्यांनी कापड विक्री आणि शिवण-काम असं दुकान सुरु केलं. त्या वेळी आमच्या दुकानाला कोरेगाव तालुक्यातील रेशनिंग कापड विक्रीचं २ नंबर चं दुकान असं दर्जा मिळालेला. कोरेगाव मधील एका कापड व्यापाऱ्याला १ नंबर आणि आमचं २ नंबर. त्या काळी रेशमी कापडाचा जास्त वापर असायचा. रेशनिंग कार्डावर मिळणारं कापड म्हणजेधोतराची जुडी९ वार अन  वार लुगडी आणि रेशमी आणि जरीचे पटके. त्या काळी धोतराच एक पान छोटीशी घडी करून काडेपेटीमध्ये बसायचं, एवढ तलम कापड असायचं ते.  आमच्या आजोबांचे वडील त्याच्या आधीच्या काळामध्ये हाताने (हात-शिलाई) कपडे बनवत असत. त्या काळाचे कपडे म्हणजे अंगरखे, बंड्या, लंगोट. त्या काळी म्हणे कात्री नव्हती तर शिंपी लोक अंगावर कापड लाऊन माप घेत असत आणि मानेला कापड लाऊन ते हाताने मापावर फाडत असत आणि मग त्याची हात-शिलाई.  आमच्या आजोबांच्या काळात मग कालांतराने शिवण-यंत्रे आली. हळू हळू तेही शिवणकाम शिकलेले. त्यांच्या काळात सुद्धा विक्रीसाठी कपडे म्हणजे तेच आणि क्वचितच कोणी मोठा माणूस काळ्या रंगाचा कोट शिवून घेत असे. आख्या पंचक्रोशी मध्ये फक्त आमच्या कडेच त्या काळी शिलाई मशीन होती. त्या काळातले  व्यवहार म्हणजे कापडाच्या बदल्यात धान्य देणे-घेणे. पैशाचे व्यवहार एकदम क्वचित. आणि त्या काळचे पैसे म्हणजे १ आण्यापासून ते १६ आण्यापर्यंत. त्या मध्ये मग तांब्याचे पैसे, भोक-पडे पैसेशालिवाहन राजाची मुद्रा असलेले पैसे, चांदीचे पैसे असत. गाव म्हटलं कि १२ बलुतेदार आलेच. गावी आमच्या पेठेत जास्त करून वाणी लोक. जास्त म्हणजे एका वाण्याची हि सगळी वाढलेली प्रजावळ. हा शोध हल्लीच्या च १-२ पिढीतल्या काही हौशी लोकांनी इकडून तिकडून गोळा केलेल्या सगळ्यांच्या घरातल्या मूळ माणसाचा शोध घेत घेत काढलेला एक तक्ता आणि नंतर त्या मध्ये असं दिसतं की एकच कोणीतरी 'नागोजीनावाचा व्यक्ती होता, त्यानंतर त्याचा मुलगा आबाजी आणि मग पुढच्या पिढ्या आणि विखुरलेली कुटूंब. आज त्यांची साधारण ३०-३५ विभक्त कुटुंबे आहेत. आणि यामधील ७० टक्के लोकांचा किराणा माल आणि धान्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या प्रमाणेच इतर हि व्यवसाय करणारे  लोक आमच्या बाजार पेठेमध्ये आहेत. आमच्या गावामध्ये जातीने शिंपी असलेले आमचे एकच कुटुंब. तर असा हा आमचा जातीचा व्यवसाय. याची नांदी आमच्या 'दादा'नी खूप व्यवस्थितरीत्या रुजविली. तथापि दोन्हीकडील व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी दोघा भावांना २ ठिकाणी राहणं गरजेचं होतं. मग आमचे दादा पिंपोडे मध्ये राहिले आणि काका पुसेगाव येथे. ह्या दोघांची एकमेकांवर फार निष्ठा होती. एकमेकांवर खूप विश्वास होता. उधारीचे गिऱ्हाईक वाढू नये म्हणून मग नंतर-नंतर त्यांनी ६-६ महिने एकदा 'दादा' पुसेगाव ला आणि 'काका' पिंपोडे ला, एकदा 'काका' पुसेगाव ला आणि दादा' पिंपोडे ला असं चालू केलेलं. पहिल्यापासूनच ह्या दोघा भावांची देवावर फार फार श्रद्धा. दोघेही पांडुरंगाची खूप सेवा करत. आमचे 'दादा' महिन्याची पंढरपूर ची वारी करत. दर १५ दिवसाला मोहोटकरांची वारी पंढरी ला पोहोचावी यासाठी, दादांनी दर शुद्ध एकादशी ची वारी सुरु केली आणि काकांची वद्य एकादशीची. दर शुद्ध एकादशीला ते पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला जात. गेले कि ३-४ दिवस तरी त्यांचा मुक्काम तिथे एका बडव्याच्या घरी असे. चंद्रभागे मध्ये स्नान, नित्य हरिपाठ आणि पोथीवाचन. मग वास्कर महाराजांच्या फडावर जाऊन त्यांचं दर्शन. ते नाहीच झालं तर वास्कर-वाड्यावर जाऊन डोकं टेकवून  का होईना वारी पोहोचवायची आणि मग पांडुरंगाच प्रत्यक्ष दर्शन. बाहेर आल्यावर कळसाच दर्शन आणि मग नगर-प्रदक्षिणा. हे सगळं झाल्यावर वारी पोहोचावल्याचा आनंद त्यांना मिळत असे.  

|| अवघेचिये तिर्थे घडली एक वेळाचंद्रभागा डोळा देखलिया,
अवघेचिये पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखलिया ||
|| अवघेचिया संता एक वेळा भेटीपुंडलिक दृष्टी देखलिया,
तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थकविठ्ठलची एक देखलिया ||

सांगण्याची गोष्ट म्हणजे, आमच्या दादांनी एका थोर महाराजांना आपला गुरु मानलं होतं. ते म्हणजे ह.भ.प. वै. तात्यासाहेब वास्कर महाराज. या वास्कर महाराजांचा फड खूपच प्रसिद्ध आणि पुण्य मानला जातो. पंढरपूरमध्ये 'काळा मारुती' मंदीराजवळ वास्कर-वाडा आहे. तिथे त्यांचं वास्तव्य असायचं. आमच्या आप्पांनी जेव्हा वारीचा वारसा चालवायला घेतला तेव्हा आपांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ ही दादांच्या विनंतीवरून वास्कर महाराजांनीच  घातलेली.  त्यामुळे  आमची  आत्त्याआप्पांना खूप भाग्यवान मानते. असा हा वारीच्या पुंण्याचा आनंद साखरेहून ही गोड आहे . त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग द्वादशीला उपवास सोडून ते परतत असत. येताना प्रसाद म्हणून चिरमुरे, लाह्या-बत्तासे, रेवड्या तसेच गुलाल-बुक्का, चंदनाचे हार, गंध-गोळ्या, चंदन आणि "विठ्ठल बाळोबा लाड" यांची सुवासिक अगरबत्ती ह्या सगळ्या वस्तू आणत असत. विशेष म्हणजे त्या काळापासून आज हि आमच्या घरी हीच अगरबत्ती वापरली जाते. बऱ्याचदा दुकान ची गिऱ्हाइके त्यांना आवर्जून प्रसाद आणि यापैकी काही वस्तू आणायला सांगत. 'दादा' जेव्हा एकादशीची वारी करून पंढरपूरहून परतत, तेव्हा आम्ही सगळे प्रथम त्यांना साष्टांग दंडवत घालत असू. याचा अर्थ असा कि आपल्याला वारीचा अंश का होईना पोहोचला.

आमच्या दादांनंतर, आप्पांनी म्हणजे माझ्या वडिलांनी ह्या पंढरीच्या वारीचा वारसा निरंतर सुरु ठेवला. पण, अलीकडच्या ४-५ वर्षामध्ये त्यांनाही दर महिन्याला वारी पोहोचवणं अवघड पडतं आहे. पूर्वीच्या काळामध्ये कुटूंब मोठी असायची. १ माणूस बाहेरगावी गेला तरी मागे पाहणारी इतर खूप माणसं घरामध्ये असायची. त्यामुळे वारी सहजपणे शक्य ह्वायची. आज कुटूंब विभागली गेली आहेत. घरातला कर्ता पुरूषच जर बाहेरगावी गेला तर मागे व्यवसाय, शेती आणि इतर बऱ्याच गोष्टींमध्ये खंड पडतो. आज त्यांचंही वय ६८ झालं आहे. वयोमानान आणि पायाच्या दुखण्यान त्यांना ही होत नाही. पण जमेल तेव्हा आणि वेळ मिळेल तेव्हा पंढरी ला जाऊन येतात. पण मला स्वतःचा नेहमी राग येतो आणि लाज ही वाटते कारणपरंपरेने चालत आलेली ही वारी आज आपण कळते झालो आहोत तरी पुढे चालवू शकत नाही. माझ्या आजोबांनी घालून दिलेली ही संस्कृतीची नांदी मी आज पुढे चालवू शकलो नाही, याची खंत कायम माझ्या मनामध्ये मला सलत राहील. पण एवढ नक्की, कि जेव्हा जेव्हा होईल आणि जेवढी जास्तीत जास्त होईल तेवढी सेवा मी पांडुरंगाची नेहमी च करत राहीन.

|| हेचि देवा पै मागतचरण सेवा अखंडित
वास घडो पंढरीचा, सदा संग हरिदासांचा ||
|| जन्म हो का भलत्या याति, परी न सुटे हरिभक्ती
नामा म्हणे कमलापति, हेच द्यावे पुढता-पुढती ||

एक गोष्ट मला अभिमानाने सांगू वाटते ती म्हणजे, आमच्या दुकानात आलेले गिऱ्हाईक पहिल्यांदा 'दादा'ना साष्टांग नमस्कार करी, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करी आणि मग त्यांना काय घ्यायचंय-नकोय ते सांगत असत. तेव्हा मी असेन बालवाडी, पहिली-दुसरीला. मोठ्या कुतूहलानं मी ते दृश्य पाहत असे तेव्हा. तेव्हा त्यातला भावार्थ मला कधी कळला नाही. पण आज जेव्हा ते बालपण आठवतं तेव्हा जाणवतं कि लोकांच्या मनामध्ये आज तेवढा आदार, ते प्रेम, तो जिव्हाळा राहिलेला नाहीये. आमच्या 'दादांचे गावातील स्नेही म्हणजे कुलकर्णी कुटुंब. शंकर भास्कर कुलकर्णी, श्रीधरपंत कुलकर्णी, मारुती बुवा तसेच इतरही बरेच समवयस्क लोक जे अध्यात्मिक, प्रामाणिक, सभ्य आणि सात्विक होते. या-पैकी कोणीही दुकानात आले ली एकमेकांच्या पाया पडणं हे ठरलेलं असे. वारकरी-संप्रदायामध्ये "तोची बंधू, तोची साधू" असं म्हटलेलंच आहे. आम्हालाही 'दादा' मग त्यांना साष्टांग नमस्कार घालायला लावत. त्यांचे स्नेही मग लाडाने जवळ घेत आणि माया करत. ब्राम्हण स्नेहिंपैकी कोणीही दुकानात आले कि 'दादा' घरात हाक मारून कपभर का होईना दूध मागवीत आणि त्यांना घेतल्याशिवाय जाऊ देत नसत. ब्राम्हणांबद्दल  'दादांना' खूप आदर होता. खूप खूप महत्व सांगायचे नेहमी आम्हाला 'दादा' ब्राम्हणांच. आणि आज ही आम्हा सर्व कुटुंबियांना तो आदर कायम आहे आणि राहील. हीच परंपरा आजही आम्ही जपतो आहे. आमचं घर हे दुकानाच्या मागेच आहे, त्यामुळे दुकानात कोणीही जवळचे स्नेहीव्यापारी, आप्तेष्ट आले कि त्यांना चहा-पाणी केल्याशिवाय 'दादा' सोडत नसत. बरेच व्यापारी त्या काळी लांबून येत असत (सूरत, अहमदाबाद, तिरुपूरमालेगाव, गुलेदगुड्ड, बनहट्टी, इचलकरंजी, इरकल इ.) मग कधी कधी संध्याकाळी एखाद्या व्यापाऱ्याचा मुक्काम पडायचा. मग त्या रात्री जेवणाला आमच्याकडे खास बेत असे, कधी श्रीखंड, कधी पुरण-पोळी तर कधी खीर. त्या काळात अचानक घरच्या घरी बनवायचे गोड पदार्थ म्हणजे हेच. पण वाटसरू कोणीही असो, त्याचा पाहुणचार आमच्या घरी खासच होत असे. आमचे आप्पा,  त्या  काळचा  एक  किस्सा  नेहमी  सांगतात.   दादांचे एक वारकरी सांप्रदायिक स्नेहीम्हणजे श्री.शंकरराव सरोदेमुळचे बार्शीचे, तेव्हा त्यांचं वय होतं ११०. त्यांच्या नातवाचं वाई-पाचगणी कडे लग्न होतं. आणि लग्न उरकून ते पुन्हा बार्शीकडे जाताना पिंपोड ला दादांची भेट घेण्याकरता थांबलेले. तब्बल २ एसटी गाड्या भरून वऱ्हाड होतं त्यांच्याबरोबर तेव्हा. तर दादांच्या आग्रहाखातर तेव्हा २ गाड्या भरून वऱ्हाड आमच्या घरी तेव्हा मुक्कामी होतं. त्या सगळ्या मंडळींची रात्रीच्या जेवणाची आणि झोपण्याची व्यवस्था मोठ्या आनंदाने केलेली आमच्या 'दादां'नी. तेव्हा त्या ज्येष्ठ स्नेहींची म्हणजेच 'श्री. शंकरराव सरोदे' यांची दादांनी स्व-हस्ते "पाध्य-पूजा"  केलेली, त्यांना संपूर्ण आहेर आणि खूप मोठा मान-पान केलेला. याही पेक्षा विशेष म्हणजे, जाताना वऱ्हाडातील सगळ्या बायकांची खणा-नारळाने ओटी भरलेली आमच्या आजीने आणि पुरुषांना टॉवेल-टोपीचा मान-पान करून पाठवलेलं दादांनी.  'दादांच्या' या आदर आणि प्रेमामुळे त्या आदरणीय व्यक्तीच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. आणि त्यांनी मग अगदी आदराने पत्राद्वारे दादांचे आभार मानलेले. हि होती आमच्या घरची संस्कृती, आमची परंपरा, संस्कार, आदरार्तीथ्य. कदाचित हा ही एक आमच्या संप्रदायाचा च भाग आहे.

 
आज मी Software Engineer  आहे. पुण्यासारख्या IT ने ग्रासलेल्या आणि career च्या मागे  धावणाऱ्या  लोकांच्या शहरामध्ये राहतो आहे. धावपळीच युग आहे, कसलाही निवांतपणा नाही. पण जमेल तेवढी भक्ती, जमेल तेवढी पांडुरंगाची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ही सेवा अखंड माझ्या हातून घडो एवढ एकच माझं मागणं आहे पांडुरंगाजवळ......

मागणे हे एक तुज प्रति आहे । देशील तरी पाहे पांडुरंगा 
या संतांसी निरवी हेचि मज देई । आणिक काही तुज न मागू देवा ॥
तुका म्हणे आता उदार तू होई । मज ठेवा पायी संतांचिया ॥

||  पांडुरंग हरी  वासुदेव हरी  ||
||  पांडुरंग हरी वासुदेव हरी ||

४ टिप्पण्या:

  1. khoop bare vatle vachoon aamchyakde pan varkari pampara aahe pan hi parmapara pudhe chalvat nene nityache aahe.

    उत्तर द्याहटवा
  2. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा | तुझी चरणसेवा पांडुरंगा ||
    असं आहेच तरी अजुन वारकर्‍यांच्या सेवेची केलेली अपेक्षा यामुळेच
    आपुलिया हिता जो असे जागता | धन्य माता पिता तयाचिया ||

    उत्तर द्याहटवा
  3. मागणे हे एक तुज प्रति आहे । देशील तरी पाहे पांडुरंगा ॥
    या संतांसी निरवी हेचि मज देई । आणिक काही तुज न मागू देवा ॥
    तुका म्हणे आता उदार तू होई । मज ठेवा पायी संतांचिया ॥

    उत्तर द्याहटवा