|| राम-मंदीर आणि राम-नवमी उत्सव ||
गावी, आमच्या बाजार-पेठेतच राम-मंदीर आहे. हे मंदीर १९४९-५० च्या दरम्यान उभारलेलं. मंदिराच बांधकाम दगडी आणि छत कौलारू आहे. पूर्वाभिमुख असलेल्या श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाई च्या सिंहासनारूढ मूर्ती खूपच सुरेख, रेखीव, सुबक आणि लावण्यवान आहेत. गाभाऱ्याला लागून सागवानी लाकडांच्या खांद्यांवर उभा असलेला सभामंडप आणि गाभारयापासून साधारण २० फुटावर एका चबुतऱ्यावर रामारायाकडे तोंड करून आणि हात जोडून उभी असलेली "श्री हनुमानाची" पश्चिम-मुखी मूर्ती आहे. जेव्हा ह्या मूर्तींना आम्ही अभिषेक घालतो, पूजा करून पोशाख चढवतो, हार-फुलांनी सजवतो, गंध लावतो तेव्हा मूर्तींकडे पाहून पाहणारा मंत्र-मुग्ध होऊन जातो आणि डोळ्याचं पारणं फिटत. हे मंदीर उभं करण्यामध्ये आमचे 'दादा' आणि आणखी ६ जण, अशा ७ जणांच्या पेठ्करी मित्र-मंडळींचा लाख मोलाचा वाटा आहे. याच ७ जणांच्या राम-मंदीर संस्थापक मंडळाने राजस्थानातील 'जयपूर' शहरी जाऊन मूर्ती घेऊन त्या 'काशी' ला नेल्या आणि तिथे काशीतील भटजींकडून विधिवत पूजा करून त्या गावी आणल्या आणि मग त्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली गेली. आजही त्या मूर्ती, मंदीर आणि मंदिरामध्ये त्या काळच्या लोकांनी रुजवलेली संस्कृती बऱ्यापैकी सुरु आहे. तेव्हापासून आज-पर्यंत "श्री राम-नवमी" चा सोहळा सालाबादप्रमाणे चालत आला आहे. हे मंदीर, मूर्ती आणि इथला सोहळा या सगळ्यामध्ये पहिल्यापासून आमच्या 'दादांचा' खूप खूप मोठा सहभाग असे. 'राम-नवमी' चा सोहळा सुरु झाल्यापासून ह.भ.प. वै. दत्तुबुवा महाजनी महाराज यांच्याकडे व्यासपीठ असे. हे महाराज सातारचे. ते एक उत्तम कीर्तनकार आणि खूप मोठे ज्ञानी युगपुरुष होते. त्यांचा अध्यात्माचा अभ्यास खूप गाढा होता. मराठी चित्रपट सृष्टीतील 'रवींद्र महाजनी' हे त्यांचे पुतणे होत. आमच्या सोहळ्यामध्ये, चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच "गुढी-पाडवा" ते "राम-नवमी" असा ९ दिवसांचा हा उत्सव.... यामध्ये पहाटे मूर्तींना अभ्यंग-स्नान, काकडा-आरती, मग सकाळी आणि दुपारी "श्री ज्ञानेश्वरी" पारायण, संध्याकाळी महाराजांचं प्रवचन, तिन्ही-सांजेला हरिपाठ, रात्री कीर्तन आणि मग त्या नंतर भजन. कधी-कधी भारुडाचा कार्यक्रम हि असायचा. "श्री ज्ञानेश्वरी पारायण"चं व्यासपीठ महाजनी महाराजांकडे असायचं. १० दिवसांचं त्यांचं वास्तव्य आमच्या म्हणजेच "रघुनाथ दादा मोहोटकरांच्या" घरी असायचं. त्यांच्याबरोबर आलेले इतर सगळे महाराज लोक, त्यांचे सेवक, टाळकरी, वीणावादक, मृदुंगमणी आणि बाहेर गावहून आलेले सगळे साधू-संत असे जवळजवळ २५-३० लोक मोहोटकरांच्या घरी १० दिवस असायचे. प्रत्येक व्यक्तीची खातिरदारी आमचे 'दादा' अगदी अदबीने करीत. कोणाला अंघोळीला गरम पाणी, कोणाला थंड पाणी, कोणाला चहा, कोणाला दूध, प्रत्येकाच्या जेवणाच्या सवयी, पान-सुपारी, सगळ्यांची झोपण्याची सोय, त्यांना अंथरूण-पांघरूण अशी सगळी सेवा आमचे दादा, काका(दादांचे भाऊ), माझ्या दोन्ही आज्जी, आत्त्या, चुलती, माझे आई-वडील अगदी आदराने करीत असत. रोज एक गोड आणि वेगळा पदार्थ या महाराज आणि साधू-संत लोकांना खाऊ घालत असत.
ह.भ.प. महाजनी महाराजांनंतर त्यांची गादी चालवली ती त्यांच्या शिष्या ह.भ.प. मालनताई पवार यांनी. लहानपणापासूनच 'ताई' महाराजांबरोबर त्यांची जिकडे पारायणं असत तिकडे जात, बालपणापासून महाराजांबरोबर त्यांनाही पारायण, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ अशी आध्यात्माची गोडी लागलेली आणि त्यांनी मग ब्रम्हचर्य पत्करलेलं. आज त्या जवळ-जवळ पासष्ठीच्या आहेत. पण त्या काळापासून आजही राम-नवमीच्या सोहळ्याला दर वर्षी त्या आमच्याकडे येत असतात. ९ दिवस "श्री ज्ञानेश्वरी" पारायण, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आणि प्रभू रामरायाची नितांत भक्ती त्या करत असतात. या १० दिवसातील त्यांचं वास्तव्य, अगदी पूर्वीच्या काळापासून ते आज-पर्यंत आमच्याच घरी असतं. या १० दिवसात त्या अगदी आमच्या घरातीलच एक कुटुंबीय असल्यासारख्या मिसळून जातात. खूप मन-मिळाऊ अन सोज्वळ स्वभाव, बोलण्यामध्ये मृदुलता, आध्यात्माचा प्रचंड अभ्यास, नियमित देवपूजा आणि पोथीवाचन, हिंदू देव-देवतांचा प्रतिक असलेल्या भगव्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी असा त्यांचा वेश, रस्त्याने चालताना लोकांनी खूप आदराने साष्टांग दंडवत घातल्यावर "श्री कृष्ण हरी" म्हणत आशीर्वाद देण्याची त्यांची नेहमीची सवय, अशा त्यांच्या खूपशा गोष्टींमुळे आम्हा सर्व कुटुंबीयांनी आमच्या मनामध्ये त्यांना देवाचं स्थान दिलं आहे. त्यांचं जेव्हा घरी आगमन होतं तेव्हा त्यांच्या चरणी डोकं ठेऊन आम्ही सगळे कुटुंबीय धन्य होतो. खरच खूप खूप पुण्यवान संत आहेत त्या. ..... आमची आई सांगते कि जेव्हा मी नेणता होतो, तेव्हा घरात राम-नवमी सोहळ्यामुळे खूप लोक, लोकांची जेवणावळ, घाई-गडबड असे आणि मी रडत असे. म्हणजे अगदी मी ६ महिने ते २-३ वर्षांचा असेन तेव्हाची गोष्ट. तेव्हा मग संध्याकाळच्या वेळी 'मालनताई' मला मांडीवर घेऊन दुकानापुढच्या ओट्यावर बसत असत. समोर मंदिरापुढे कोण्या तरी महाराजांचं कीर्तन सुरु असे. आणि टाळ-मृदुंगाच्या गजरामध्ये मग मला त्या थोपटून झोपवीत असत. तेव्हापासून ते आज मी येवढा मोठा झालो असलो तरीही मला त्या 'पनुराजा', आमच्या नानाला 'सुनु-बाळा' च म्हणतात. त्यांच्या तोंडून ही हाक ऐकल्यावर एक आपलेपणा, आईची माया जाणवते. पुढे मग शाळेत जाऊ लागल्यावर मी काही गोष्टींसाठी खूप हट्ट करी, तेव्हा त्या मला खूप मृदू वाणी मध्ये समजावून सांगत कि 'पनू-बाळा' असा हट्ट करू नये, मोठ्या माणसांना उलट बोलू नये. चांगलं वागावं, चांगलं बोलावं. खरंच, भाग्यवान आहोत आम्ही सर्व कुटुंबीय कि आजही त्यांच्याबरोबर वास्तव्याचं पुण्य आम्हाला मिळतंय. संतांनी म्हटल्याप्रमाणे, "साधू-संत येती घरा तोची दिवाळी-दसरा". आणि खरच या राम-नवमी सोहळ्याची तयारी आमच्या घरचे लोक पाडव्याचा आधी ८-१० दिवस सुरु करीत असत. धान्य निवडणे-पाकडणे, किराणा साहित्य भरणे, घरातील स्वच्छता करून ठेवणे, मंदिरातील वस्तूंची स्वच्छता करून घेणे. अशी खूप सारी कामं असायची. हा ९-१० दिवसांचा सोहळा म्हणजे जणू आमच्या घरी दिवाळी -दसराच असायचा. आजही आम्ही राम-नवमी ला पाहुण्यांना आमंत्रित करतो. एक वेळ यात्रेला नाही, पण राम-नवमीला नक्की सगळ्यांना आवर्जून बोलावतो.
आमचा हा सोहळा पाहून कोल्हापूर च्या एका गुळाच्या व्यापाऱ्याने राम-जन्म सोहळ्यासाठी ('मला मुलगा होऊ दे' असा नवस बोलून तो नवस पूर्ण झाल्यावर) चांदीचा पाळणा भेट दिलेला. दुसरा मुलगा झाल्यावर त्याच पाळण्याला चांदीच्याच साखळ्या भेट दिल्या होत्या. आमच्या दुकानातही या सोहळ्या-दरम्यान येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून या सोहळ्यासाठी वर्गणी मिळत असे. लोक स्वतः होऊन त्या काळी धान्य, पैसे, वस्तू हे 'वर्गणी' आणि 'भेट' म्हणून मंदिरामध्ये आणून देत असत. राम-जन्मकाळाचे 'कीर्तन' ऐकण्यासाठी आणि त्या सोहळ्यासाठी त्याकाळी हजारो भक्त-जन जमत असत. गावाला आणि खास करून आमच्या बाजार पेठेला या विशेष दिवशी यात्रेचं स्वरूप येत असे. त्या दिवशी आमच्या घरी त्या काळात ३००-४०० लोक जेवायला असत. हि आमच्या 'दादांनी' घालून दिलेली परंपरा आजही आम्ही जपली आहे आणि या महाप्रसादाचं पुण्य आजही आम्ही मिळवतो आहोत.
राम-मंदिर म्हणजे आमच्या दादांचं कायमचं विसाव्याचं ठिकाण. श्रावण महिन्यात तर राम-मंदिरातील गाभारयामध्ये त्यांचं 'शिव-लीलामृत' ग्रंथाचं पारायण असे. कोणीही पाहुणा येऊ देत, मंदिराच्या गाभारयाचा दरवाजा उघडून त्याला राम-रायाचं दर्शन करवल्याशिवाय ते त्यांना जाऊ देत नसत. त्या काळापासून या सगळ्या सोहळ्यामध्ये आमच्या दादांचा सक्रीय सहभाग आणि सिंहाचा वाट असल्यामुळे मंदिरातील सगळ्या मोलाच्या वस्तू, जसं कि... गाभाऱ्याची चावी, चांदीचा पाळणा, पारायणासाठी वापरल्या जाणाऱ्या २१ ज्ञानेश्वाऱ्या, राम-रायाची वस्त्रे, हे सगळं आमच्याकडेच ठेवायला असे. त्यासाठी दादांनी घरातील खास असं एक शिसावाचं कपाटच ठेवलं होतं. जीवापाड जपायचे आमचे दादा ह्या सगळ्या वस्तू. वेळच्या वेळी त्याची साफ-सफाई, दुरुस्ती, देख-भाल. राम-नवमी दिवशी आम्हा भावंडांना सकाळी सकाळी 'दादा' काम सांगायचे ते म्हणजे तो चांदीचा पाळणा स्वच्छ करायचा. आणि तो धुवून वगैरे नव्हे तर... रांगोळी ने आधी तो घासायचा, त्याने एक प्रकारची झळाळी येते आणि काळपटपणा निघून जातो. मग नाजूक तारांच्या ब्रशने तो घासायचा आणि मग मलमली कपड्याने तो स्वच्छ पुसायचा. आणि आम्ही अगदी मनापासून तो स्वच्छ करत असू. त्यातली कुंची आधीच धुवून स्वच्छ करवून घेतलेली असायची परीटाकडून. दर वर्षी दुकानातील नवीन रेशमी कापड काढून त्या पाळण्यातील छोट्याश्या गाडीवर ते नवीन रेशमी वस्त्र अन्थरायचं आणि मग तो पाळणा मंदिरामध्ये पाठवायचा. त्या काळी ह.भ.प. महाजनी महाराजांना पारायणाच्या वेळी पाटावर किंवा खुर्चीवर बसावं लागत असे; म्हणून 'दादांनी' मिरजेच्या एका प्रसिद्ध सुताराला बोलावून घेऊन. स्वखर्चाने सागवानाचं 'आसन' / 'व्यासपीठ' बनवून घेतलेलं. हे आसन आम्ही राम-नवमी च्या कालावधीतच ९ दिवस मंदिरामध्ये देतो. त्याच मिरजेच्या सुताराकडून त्या काळी 'दादांनी' शिसावाच्या लाकडाचे २ विणे आणलेले. त्यातील एक मंदिरामध्ये आहे आणि एक आमच्या घरी. मंदिरातील वीणा त्या ९ दिवस-रात्रीमध्ये खाली न ठेवता अखंड वाजवला जाई. आणि घरी वीणा आणायचं कारण म्हणजे, आम्ही 'नामदेव शिंपी; 'वीणा' हे संत नामदेवांच्या संतवाणीचं माधुर्य जपण्याचं वाद्य. दर नामदेव पुण्यतिथीला नामदेवाच्या तसबिरीसमोर आम्ही तो वीणा ठेऊन त्याची पूजा करतो. घरी देव-पूजेसाठी कोणतीही नाविन वस्तू आणायची असेल तर 'दादा' घेतानाच त्या २ वस्तू घेत असत. एक मंदिरासाठी आणि एक घरातील देवांसाठी. मग ती आरतीसाठी वाजवली जाणारी घंटी असो, गंध उगाळण्यासाठी आणलेलं चंदन असो किंवा नविन चौरंग असो. १९५० सालापासून मंदिराच्या या सगळ्या वस्तू 'दादांनी' खूप प्रामाणिकपणे आणि मनोभावे पुजल्या आणि जपल्याही. खरच, 'दादांचा' काळ सोन्यासारखा होता.
हि सगळी परंपरा दादांच्या बरोबर आमच्या आप्पांनी म्हणजेच आमच्या वडिलांनी हि जपलीये. त्यांचही बालपण दादांबरोबर राम-रायाची आणि राम-नवमीच्या काळामध्ये घरी येणाऱ्या रामाच्या भक्तांची सेवा करण्यात गेलं. पंढरपूरच्या महिन्याच्या वारीचा वारसाही त्यांनी पुढे सुरु ठेवला, ज्या काही रूढी-परंपरा आमच्या 'दादांनी' सुरु केल्या होत्या त्या आमच्या अप्पांनी कायम सुरु ठेवल्या. आजही राम-नवमीचं जेवण म्हणजेच महाप्रसाद हा आमच्याच घरी असतो. जन्म-काळाचं कीर्तन संपलं आणि पाळण्यावर फुलं पडली कि सगळे महाराज लोक, टाळकरी, विणेकरी, मृदुंग-मणी, पारायणाला बसलेले भक्त-जन हे सगळे महाप्रसादासाठी आमच्या घरी येतात. दर वर्षी जेवणाबरोबर आम्ही काहीतरी विशेष गोडधोड करतोच; मग कधी जिलेबी, कधी मोतीचूर लाडू, कधी आम्रखंड. जेवणानंतर सगळ्यांना पान-सुपारी. दुसऱ्या दिवशी मंदिरापुढे भंडाऱ्याचा प्रसाद असतो. या महाप्रसादाचं वैशिष्ठ्य म्हणजे यामध्ये गव्हाची खीर आणि आमटी-भात असा हा प्रसाद असतो. भरडलेल्या गव्हाच्या खिरीची चव एवढी अप्रतीम कि बस!
अशा ह्या आमच्या बाजार-पेठेतील राम-नवमी उत्सव सोहळ्यासाठी आख्ख्या पंचक्रोशी मधील लोक जमायचे. राम-जन्म काळाचं कीर्तन, पाळण्यावर होणारा फुलांचा वर्षाव राम-नामाचा एकच होणारा जयघोष, त्यानंतर प्रसाद म्हणून वाटला जाणारा सुंठवडा, राम-रायाचं दर्शन, पाळण्याचं दर्शन.......... अजूनही बालपणी होणारा 'तो' उत्सव डोळ्यापुढे ताजा आहे.
........ पण आज काळ बदलला, लोक बदलले आणि लोकांची वृत्तीही बदलली. ७-8 वर्षांपूर्वी काही समाजकंटक स्वभावाच्या लोकांनी न पाहवून, आमच्या घरी ठेवायला असणाऱ्या वस्तू मुद्दामहून मंदिरामध्ये ठेवण्यास मागितल्या. त्या लोकांना हे सलत होतं कि, का म्हणून ह्यांच्याच घरी सगळा मान? मग आप्पांनी बिनदिक्कत सगळ्या वस्तू एका मिटींगमध्ये इतर सभासदांच्या हवाली केल्या. देताना त्यांना नक्कीच वाईट वाटलं असावं, कारण ज्या भक्तिभावाने त्याची काळजी आमच्या घरी घेतली जात होती ती तिथे घेणारं कोणी नव्हतं. आप्पांनीही जेवढं होतं होईल तेवढं मंदिरासाठी केलंय. पण काही स्वार्थी वृत्तीच्या लोकांमुळे आणि आजच्या राजकारणामुळे आप्पांप्रमाणेच इतर बऱ्याच लोकांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवलेली मला जाणवते. मंदिरामध्ये एका कोपऱ्यातल्या खोलीत धुळीने माखलेल्या कपाटामध्ये त्या सगळ्या वस्तू आज खूप विचित्र अवस्थेत आढळतात. आज जेव्हा ते 'ज्ञानेश्वरी' ग्रंथ उघडले जातात, तेव्हा त्यामध्ये वाळवी लागलेली दिसते. ग्रंथांची पाने कुरतडलेली दिसतात. त्याचे कव्हर फाटलेले दिसतात. चांदीच्या पाळण्याची अवस्था पाहिल्यावर वाईट वाटते. त्या पाळण्यातील कुंचीला घाण वास येत असतो. गेल्या कित्त्येक वर्षांमध्ये त्यातलं कापड बदललेलं नसतं. मंदिराच्या गाभाऱ्यातील निम्म्या-अर्ध्या पूजेच्या वस्तू गायब झालेल्या आहेत आणि ज्या शिल्लक आहेत त्यावर वर्षानुवर्षांची धूळ साठलेली दिसते. काकडा-आरतीच्या काळामध्ये राम-रायाच्या अंगावर चढवण्याची वस्त्रे आज वर्ष वर्ष कोणी धुवायलाही नेत नाही. गाभाऱ्यातील समई गेल्या कित्त्येक वर्षांमध्ये कोणी घरी घासायलाही नेलेली नाही. 'दादांच्या' कारकिर्दीत ह्या सगळ्या गोष्टींची ते स्वतः जातीने काळजी घ्यायचे. पण आज जेव्हा हे सगळं मी स्वतः डोळ्याने पाहतो, तेव्हा बालपणीचे दिवस आठवतात आणि वाईट वाटतं. चीड येते त्या दृष्ट लोकांची ज्यांनी न पाहवून स्वार्थी-पणाने ह्या वस्तू मंदिरामध्ये मागवून नेल्या आणि आता त्याकडे कोणी पहातही नाही. गेल्या १५-२० वर्षामध्ये मग गुढी-पाडवा ते राम-नवमी असं ९ दिवसांचं जेवण पेठकरयांनी घरोघरी वाटून घेतलं. सोहळ्याला येणाऱ्या महाराज लोकांची झोपण्याची सोय मंदिरामध्ये केली जाऊ लागली. आज ह्या लोकांना झोपण्यासाठी साधी चटई सुद्धा कोणी घरून आणून देत नाही ना पांघरायला चादर. ना पाण्यासाठी कोणी पिंप अथवा कळशी देतं, ना कोणी ह्यांना घरी चहा-पाणी, नाश्त्याला बोलावतं. अक्षरशः भिकारयासारखी वागणूक मिळू लागल्याने नेहमी येणारे साधू-संतांनी आमच्या सोहळ्याकडे पाठ फिरविली. मधल्या काही काल-खंडामध्ये फक्त २-३ लोकच येऊ लागलेले. सालाबादप्रमाणे चालत आलेला सोहळा बंद पडू नये म्हणून आजच्या काही लोकांनी शेवटी स्वतः आळंदीला जाऊन ५-६ महाराज लोकांना आमंत्रण देऊन आणि पैसे ठरवून बोलवणे सुरु केले. .... पण राम-नवमी च्या सप्ताहासाठी स्वतःहून पूर्वी येणारे साधू-संत आणि आजच्या काळात आपण जाऊन पैसे ठरून महाराज लोक आणणे यात खूप फरक आहे..... सांगण्याचं तात्पर्य एवढंच कि, एखादी चांगली गोष्ट करता येत नसेल तर गप्प बसावं आणि समोरचा ती गोष्ट ज्या चांगल्या रीतीने करतोय ते पाहावं. पण वाईट गोष्ट मात्र करू नये. स्वतःला ती जमत नाहीये म्हणून जळण्यापेक्षा देवाची सेवा होतेय याकडे जास्त लक्ष द्यावं. असो. या बाबत माझी कोणाबद्दलही तक्रार नाहीये. कारण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती.
त्या नंतरच्या काळामध्ये तरुण पिढीने मग राम-नवमीच्या सोहळ्याची जबाबदारी उचलली. पण ती फक्त एकच वर्षासाठी. तेवढं एक वर्ष हा सोहळा पुन्हा बऱ्यापैकी झालेला. पण त्यांनीही मग लक्ष देणं बंद केलं. यालाही काही कारण असावं. पण एक मात्र नक्की, सामाजिक कार्यामध्ये किंवा धार्मिक सोहळ्यांमध्ये जेव्हा राजकारण येतं, दुजाभाव येतो, एकमेकांबद्दल तुष्टता येते तेव्हा त्या कार्याला वाळवी लागायला सुरुवात होते.
पण ज्येष्ठांपैकी काही मंडळी आणि आजच्या तरुण पिढीतील काही मंडळींनी आजही हा सोहळा सुरु राहण्यासाठी प्रयत्न ठेवले आहेत. तेवढीच मंडळी दर वर्षी मिटिंग भरवतात, वेग-वेगळी कमिटी बनवतात, जसे कि वर्गणी, धान्य, भंडारा कमिटी इ. आणि त्याप्रमाणे कामं वाटू घेतात. पूर्वी सभासद सगळ्यांच्या घरोघरी जाऊन वर्गणी आणि वर्गणी रुपात धान्य गोळा करत असत. त्यातून मग सोहळ्याचा खर्च आणि शेवटच्या दिवशीचा भंडाऱ्याचा खर्च निघत असे. पण आज धान्याची पोती घेऊन घरोघरी फिरायला ज्येष्ठ मंडळींना वयोमानानं जमत नाही आणि तरुण पिढीला या कामाची लाज वाटते. मग या वर्षी तर अक्षरशः धान्य गोळा करणे हि बंद केले आहे आणि वर्गणी ही नाही. नक्की ठाऊक नाही, पण माझ्या मते या वर्षी फक्त सभासद वर्गणीतून हा सोहळा पार पडलेला आहे. .... असो. सोहळा सुरु आहे हे खूप आहे.
दादांच्या काळामध्ये मंदिरामध्येच असलेल्या एका खोलीमध्ये एक पुजारी कायमचा वास्तव्व्यास ठेवला गेला होता. ते म्हणजे ह.भ.प. विकास पुजारी. ह्या नवरा-बायकोंनी त्यांच्या मंदिरातील वास्तव्व्याच्या दरम्यान मंदिराची आणि मूर्तींची देखभाल खूप व्यवस्थितरीत्या केली. पण पुन्हा एकदा काही मंडळींनी त्यांच्या तिथल्या वास्तव्व्यास मज्जाव केला. ह्या लोकांची विचार-सारणी म्हणजे, पुजारयाना ठेवण्यापेक्षा तिथे एखादा भाडेकरू ठेवला तर आपल्याला त्याचे पैसे मिळतील. एवढी हलकट वृत्ती. पण त्यांनी हा विचार नाही केला कि मग आपल्या रामरायाची सेवा कोण करणार? मग मधल्या १०-१५ वर्षांमध्ये तर रामरायाच्या मूर्तींकडे कोणाचं लक्ष ही नसे. सोहळा सुरु असायचा, पण मूर्तींची स्वच्छता, नित्य-नियमाने पूजा-अर्चा हेही बंद झालेलं. मग नेहमीच्या सभासदांनी पुन्हा एकदा मिटिंग भरवून असा ठराव केला कि १२ महिन्यातील प्रत्येक एक महिन्यासाठी एका व्यक्तीकडे पूजा-अर्चा राहील. आणि तेव्हापासून आमच्याकडे कार्तिक महिन्याची पूजा-अर्चा असते. ह्या महिन्यामध्ये मंदिरामध्ये पूर्वीच्या लोकांनी सुरु केलेला काकडा-आरती अजूनही असतो. पहाटे ५.४५ ला काकडा आणि ६.३० नंतर आरती. जेव्हापासून या महिन्याची सेवा आमच्याकडे आलीये तेव्हापासून 'आप्पा' न चुकता काकडा-आरतीला असतातच. त्यांच्याबरोबर न चुकता कायम हजार असणारे 'श्री. सुभाष-काका'. हे म्हणजे कै. जगन्नाथ महाजनांचे कनिष्ठ चिरंजीव. या आधीच्या पिढीमध्ये आमचे 'दादा' आणि 'जगन्नाथ-आण्णा' हे २ लोक न चुकता काकडा-आरती ला असायचे. आणि आज त्यांचाच वारसा, नंतरच्या पिढीतले दोघांचे कनिष्ठ चिरंजीव म्हणजेच आमचे 'आप्पा' आणि 'सुभाष-काका' यांनी अखंड सुरु ठेवलेला आहे. त्याचबरोबर संजू-आण्णा, शिवा-काका, काकी, ठोंबरे-तात्या, काकू, प्रशांत इ. मंडळीही न चुकता काकडा-आरतीला हजर असतात, या लोकांबद्दल मला खूप आदर आहे.
आधीच्या काळातलं माहित नाही, पण जसं कळतंय, तसं एक गोष्ट मला कायम जाणवली कि येवढ्या सुंदर आणि सुरेख असणाऱ्या मूर्तींसाठी लोकांच्या मनामध्ये किंमत नाहीये का? खूप खूप खूप लाजवाब मूर्ती आहेत आमच्या मंदिरातल्या. पण त्या मूर्तींची सजावट किंवा मंदिरातील गाभाऱ्याची सजावट ही मी कधीच केलेली पहिली नाही. जेव्हा आपण पुण्या-मुंबईत, कोल्हापुरात किंवा कोणत्याची शहरामध्ये कोणते उत्सव पाहतो, तेव्हा तुम्ही बाहेर किती आणि कोणते कार्यक्रम राबवताय यापेक्षा मंदिर, मूर्ती आणि गाभाऱ्याची सजावट या गोष्टींवर जास्त भर असतो लोकांचा. अलीकडच्या १०-१२ वर्षात जसा मी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी बाहेरगावी आहे तशी ही गोष्ट मला अगदी प्रामुख्याने जाणवली. आणि हेच मनात ठेऊन गेल्या ४ वर्षांपासून राम-नवमी ला मूर्तींची आणि मंदिराच्या गाभाऱ्याची सजावट मी करण्याचा 'वसा' घेतलेला आहे. आज हे चौथं वर्ष आहे, स्वखर्चाने मी एका गरजू माळ्याच्या मुलाला हे सजावटीचं काम देतो आहे. देवासाठी पैसे किती खर्च होतात याचा मी कधीच विचार केला नाही. खर्च केलेले पैसे जर चांगल्या कामासाठी वापरले जाणार असले तर मला कधीच हरकत नसते. कारण देणारा शेवटी तोच असतो. ही काही फार मोठी गोष्ट नाहीये, पण मला स्वतःचा स्वाभिमान वाटतो, कि स्वतःहून मी देवासाठी काहीतरी करतोय आणि मनाला शांती लाभते कि आपण काहीतरी शुभ-कार्य करतोय, पुण्य करतोय.
आजही हा सोहळा आजची काही ज्येष्ठ मंडळी आणि तरुण पिढीतील आम्ही मंडळी यांनी चांगल्या रीतीने जपण्याचा प्रयत्न केला आहे आणि करत आहोत. मी सुद्धा त्यांच्यातलाच एक भाग आहे. आणि इथून पुढेही तो चांगल्या रीतीने पार पाडण्याचा आम्ही सदैव प्रयत्न करू. हीच रामरायाचरणी प्रार्थना.
|| जय श्री राम, जय श्री हनुमान ||
|| मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र कि जय ||
विशेष सूचना: वरील लेखामध्ये व्यक्त केलेली खंत किंवा तक्रार ही कोणालाही व्यक्तिगत किंवा उद्देशून केलेली नसून गैर-समझ करून घेण्यापेक्षा त्यातील भावार्थ समझुन घ्यावा व सध्याच्या कमतरता भरून काढण्यावर जास्त भर द्यावा, ही विनंती.
Vastvik chitra kupach spast shabdat wyakt kele ahes. I wish all old days come again.
उत्तर द्याहटवाह.भ.प.दत्तात्रय महाजनी महाराजांद्दल अधिक माहिती मिळेल का
उत्तर द्याहटवा