आम्ही सगळे रोज एकमेकांशी गप्पा मारत असू. काही जुने आणि वयस्कर बांधवही आमच्यामध्ये बांधले गेलेले. त्यांचे अनुभव सांगताना ते म्हणत, "पोत्याचा जन्म लय वाईट, आपल्याला कधीही कुठेही कसंही वापरतात". एकदा दोघांच्या गप्पा चाललेल्या मी ऐकल्या.... एकजण म्हणाला, "मला आयुष्यात नेहमीच गोड खायला मिळालं, कारण माझ्यात नेहमीच साखर भरलेली असते". दुसरा म्हणाला, "मी इकडे नवीनच आलोय, ह्याच्या आधी मी मालकाच्या घरी नेहमी ओझी वाहायचं काम केलं. कारण माझा मालक मास्तर होता, बदली झाली कि माझ्यामध्ये कधी भांडी भरायचा, कधी पुस्तकं, तर कधी कपडे. आणि ह्या गावावरून त्या गावाला, ह्या गाडीतून त्या गाडीत... असा दर वर्षी प्रवास झालाय माझा. इतर वेळी मालक मला कायम त्याच्या माळ्यावर ठेवतो बांधून. दर वर्षी मालक स्तुती करतो माझी... म्हणतो, हे पोतं लय कामाचं... दर वर्षी बदली झाली कि खूप उपयोगी पडतं आपल्याला सामान न्यायला".
गेली ६ महिने आम्ही सारे तसेच धूळ खात एका भटारखान्यात पडलो होतो. गळीत हंगाम सुरु झाला आणि १०-१० जणांना भटारखाण्याबाहेरचं जग बघण्याचा चान्स मिळायला सुरुवात झाली.... तेव्हा कळलं कि आम्हाला सगळ्यांना एका साखर कारखान्याच्या गोडाऊन मध्ये बंदिस्त करून ठेवलेलं. दिवस उलटत गेले आणि एक दिवस बाहेर पडण्याची वेळ आमच्या १० जणांवर आली. गेली ६ महिने आम्ही एकमेकांबरोबर सुतळी बरोबरच, नात्याने, मैत्रीने आणि जिव्हाळ्याने बांधलो गेलो होतो. पण आता सगळे दुरावणार होतो, त्यामुळे दुख तर नक्की झालेलं. कारखान्याचा एक कामगार आला आणि आम्हा १० जणांना उचलून घेऊन गेला. आमच्या सुतळी ला आमच्यापासून विलग केलं आणि एका सुतळ्यांच्या ढिगाऱ्याकडे तिला भिरकावलं. आम्ही १० जण वेगळे होण्याची वेळ आली आणि दु:खांचा डोंगर लोटला. एका मोठ्ठ्या नळकांड्यातून साखरेची मोठी धार एका एका पोत्यामध्ये भरली जात होती. माझी वेळ आली. मलाही उलघडून त्या धारेखाली धरलं गेलं. १०० किलोची साखर माझ्यामध्ये टच्च भरली. आणि एका नवीन सुतळीने एका दाबणाच्या साह्याने माझं तोंड शिवण्यात आलं. दाबणाचे घाव सोसताना माझ्या अंगाची लाही लाही होत होती. पण सुतळीने समजावलं कि "आपलं जीवनच असं आहे कि वस्तुंचं संरक्षण करणे. मग ते धान्य असो, भाजीपाला असो, भांडी असो वा आणखी काही वस्तू असोत. आणि ह्या कामामध्ये माझी साथ असल्याशिवाय तू कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीस. जसं धरणाचं आणि धरणाच्या तटबंदीवरच्या दरवाजाचं नातं, तसंच तुझं नि माझं नातं आहे". आयुष्याचे असे बोध घेत माझा जीवनप्रवास सुरु झाला. इतर बांधवांच्या बरोबर आगीनगाडीसारखा पुढे जात-जात राहिलो आणि एका मोठ्या हिरव्या रंगाच्या शिक्क्याने माझं बारसं केलं. हिरव्या शाईने माझ्या पोटावर काहीसं लिहीलं गेलं आणि तिथून पुन्हा त्या आगीनगाडीच्या प्रवासाने एका मोठ्याश्या गोदामात माझी रवानगी झाली. मी एकटाच नव्हतो, माझ्यासारखे खुपजण होते तिथे.
४-५ दिवसांनी अचानक काही कामगारांच्या गोंधळाने खडबडून जाग झाली. गोदामाचा सुपरवायजर बोलला, “ह्यातली ५० जाऊ देत, बाहेर तो ट्रक उभा आहे ३४१५ नंबरचा त्यात. हि मार्केट यार्डात पाठवायचीत". २-३ हमालांनी एक-एक करून पोती पाठीवर घेऊन वाकत वाकत सगळ्यांची उचल-बांगडी करायला सुरुवात केली.… बारवर अचानक धाड पडावी तसे सगळे लगबगीने जागे झाले. अचानक माझ्या शेजारचा जाताना बोलला मला, सांभाळून रे बाबा, खूप जोरात खुपसतात हे लोक. एक हमाल माझ्याकडे सरसावला आणि त्याच्या हातातील आकडीने माझ्या कंबरेत जोरदार वार केला. जीव गेल्यागत झालं मला, असं वाटलं आता हा माझा कोथळा बाहेर काढणार ओढून. पण खांद्यावर मला उचलून घ्यायला त्यांना जोर मिळावा, म्हणून ते लोक तो आकडा वापरतात हे तेव्हा कळलं. सांडलेली साखर तुडवत तुडवत गोदामाच्या बाहेर पडलो आणि ओट्याला घासून उभ्या असलेल्या ट्रक मध्ये एका फळीवरून तोल सावरत सावरत त्या हमालाने मला नेलं. झुलत्या पुलावरून जाताना काळजात धस्स होतं तसं झालं मला. नेऊन इतर बांधवांच्या ढिगावर आडवं टाकलं. बघता- बघता पूर्ण ट्रक गच्च साखरेच्या पोत्यांनी भरून गेला. ड्राइव्हर आणि क्लीनर ने वरून पूर्ण ताडपद्रीने सगळी पोती झाकली आणि मग आमची गाडी निघाली.
२ - ४ दिवसांनी एका मारवाड्याचा मोठ्या दुकानासमोर गाडी उभी झाली तेव्हा जाग आली. मारवाडी भाषेतला दंगा कानी ऐकू येऊ लागला. साखरेचा ट्रक आला रे, त्या बाबू ला आवाज दे आणि बाब्या, हऱ्या आणि राज्याला पोती उतरवायला सांग आणि आतल्या गोदामात जाऊन देत सगळी पोती..... झालं .... मग पुन्हा मारवाड्याच्या गोदामात बंदिस्त झालो. आणखी २ दिवस गर्द अंधारात गेले आणि अखेर एका व्यापाऱ्याने मला पैसे देऊन विकत घेतलं आणि त्याच्या दुकानात मला आणखी काही मालाबरोबर डुगडुगने घेऊन आला.
क्रमशः
ओम नमो नमः शिवाय
उत्तर द्याहटवा