शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१३

पत्र

=========================================================



                                                                                                                                                                    दिनांक: २५/०६/९३

प्रिय शैलूताईस,

       पंकजचा सप्रेम नमस्कार. बरेच दिवसात खुशाली समजली नाही, म्हणून मुद्दामच पत्र लिहायला घेतलं. उन्हाळ्याची सुट्टी संपून गेल्यानंतर, मिरजेहून पुन्हा गावी येताना खरंच खूप गहिवरून आलं होतं. पुन्हा येण्याची अज्जिबात इच्छा नव्हती. पण जाउन पुढच्या इयत्तेची पुस्तकं आणि वह्या खरेदी करायच्या होत्या, तसेच नवीन रेनकोटही घ्यायचा होता, त्यामुळे तुझी आम्ही राहण्याची खूप इच्छा असतानाही, आम्हाला यावं लागलं. आल्यावर दिवस चुकल्यासारखं झालेलं, तुम्हा सगळ्यांची खूप खूप आठवण आली. आईलाही करमलं नाहीं.

       कशी आहेस? सुदर्शन, मावशी - काका आणि बाकी घरी सगळे कसे आहेत? तुझंही कॉलेज सुरु झालं असेलच. तुम्हा सगळ्यांची नेहमीच खूप खूप आठवण येते. उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण केलेली मज्जा, बागेत गेलेलो, पिक्चरला गेलेलो, आईस्क्रीम, मनसोक्त आंबे खाल्लेले, दिवस-दिवसभर पत्ते, कॅरम खेळलेलो. मधेच दिवस मामाच्या गावी गेलेलो तेव्हाही शेतात जेवण बांधून घेऊन गेलेलो, एक दिवस नदीला फिरायला गेलेलो हे सगळं खूप खूप आठवतं. खरंच, उन्हाळ्याची सुट्टी कधी संपूच नये असं वाटतं. पण कधी कधी आपापल्या गावी तर यायलाच पाहिजे आणि शिक्षण सुद्धा पूर्ण केलेच पहिजे. पण तू सांगितल्याप्रमाणे मी आता रोजच्या रोज जे शिकवतात त्याचा अभ्यास करतो. मागील वर्षी प्रमाणेच याही वर्षी चांगले मार्क्स मी मिळवणारच. तुही खूप खूप अभ्यास कर. Best of luck.

     बाकी इकडे आम्ही सगळे खुशाल आहोत. पावसाला सुरुवात झाली आहे. तुमच्याकडेही खूप पाउस असेल. पावसात भिजू नका. सगळ्यांनी तब्येतीची काळजी घ्या.

  घरातील सर्वांना मानाप्रमाणे नमस्कार आशीर्वाद. पत्र मिळताच ताबडतोब पत्रोत्तर देणे. पत्राची वाट पाहत आहे.


                                                      कळावे,
                                                  तुझा लाडका भाऊ,
                                                      पंकज 


=========================================================



      
       परवाच गावाकडचं घर आवरताना हे पत्र सापडलं. हातातलं काम सोडून ते वाचून काढलं आणि क्षणभर जुन्या आठवणीत हरवून गेलो. बालपणीचे दिवस आठवले आणि एकामागून एक क्षण डोळ्यापुढे येत गेले. कामं आवरल्यावर हे पत्र पुन्हा एकदा डोळ्याखालून घातलं आणि विचारात पडलो. जाणीव झाली कि काळाबरोबर आपण किती बदललोय.


      शैलुताई, तेव्हाची माझी सगळ्यात लाडकी बहिण! मी तिसरी-चौथीला असेन आणि ती माझ्यापेक्षा २-३ वर्षांनी मोठी. आमच्यामध्ये खूप जिव्हाळा होता, ओढ होती, आमचं खूप जमायचं त्यावेळी. आम्ही अभ्यासात हुशार होतो, आणि सगळ्यांशी कसं बोलावं-वागावं हे आम्हाला सगळ्या मावश्यांच्या मते तेव्हापासून ज्ञात होतं. मामा-मामींकडे गेलो तरी ते आम्हा दोघांना राहण्याचा खूप आग्रह करीत. शैलुताईलाही माझं खूप कौतुक वाटायचं. तेव्हापासून ते अगदी दहावी-पर्यंत आम्ही एकमेकांना खूप पत्रं लिहायचो. पत्रांमधून तिचे अभ्यासा विषयीचे उपदेश खूप छान असत. खूप काही चांगल्या गोष्टी तिने मला शिकवल्या. मला चित्रकलेची आवड आणि तिला पेंटींगची, तिनेच मला त्यावेळी क्लॉथ पेंटिंग शिकवलेलं. तिचं पत्र आलं कि मी आनंदून जायचो. परीक्षेच्या आधी तर तिचं पत्र हमखास यायचंच आणि अभ्यासाला मग एक वेगळंच स्फूरण यायचं. दिवाळी, न्यू-इयर आणि संक्रांतीला रंगीत तिळगुळ घालून खूप खूप छान ग्रीटिंग कार्ड सुद्धा अगदी ठरलेलंच असे. वाढ-दिवसाला तिचं ग्रीटिंग कार्ड मिळालं कि मला वाढ-दिवस साजरा झाल्याचा आनंद मिळायचा. त्याकाळी फोन नव्हते आणि इ-मेल वगैरे तर दूरच. पोस्टमन लांबून दिसला तरी आमच्या घरापर्यंत तो कधी पोहोचतोय याची वाट न पाहता मीच त्याच्याकडे पळत जायचो. तिचंच काय त्याकाळी कोणाचंहीं पत्र आलं तरी खूप आप्रूप वाटे. ते उघडून पूर्ण वाचे-पर्यंत मन तल्लीन होऊन जात असे.

      आमची एक मावशी मिरजेला असते. काका स्वातंत्र्य-सैनिक होते. ४-५ वर्षांपूर्वीच ते देवाघरी गेले. दोघांना मूल-बाळ नव्हते. आम्ही सगळ्यांनी तिकडे यावे आणि त्यांच्या आयुष्यातले काही दिवस का होईना सोनेरी जावेत अशी त्यांची कायम इच्छा असे. एप्रिल महिन्यात शाळांच्या परीक्षा असत मग त्या वेळी काकांचं पत्र आलेलं असे, त्यामध्ये अभ्यासासाठीच्या शुभेच्छा आणि परीक्षा संपताच मुलांना घेऊन इकडे सुट्टीसाठी येणे हा मजकूर ठरलेला असायचा. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सगळ्या मावश्या मिरजेच्या ताई-मावशीकडे जमायच्या. आणि मग आमची सुट्टीची धमाल असायची.

      आमचं सुट्टीचं कुतूहल म्हणजे मिरजेला गेलं कि काका खूप खूप लाड करायचे. मार्केट मधून आमच्यासाठी आख्खी आंब्यांची करंडी घेऊन यायचे. आई नको म्हणाली तरी आमच्या अट्टाहासाने काका आम्हाला आईस्क्रीम घेऊन द्यायचे. त्यांच्या गाडीवर बसून ते आम्हाला बागेत घेऊन जायचे, भेळ घेऊन द्यायचे. आम्ही अगदी कंटाळे-पर्यंत, मनसोक्त घसरगुंडी, झोपाळा सगळं खेळून होईतोपर्यंत ते बसायचे.  काकांच्याकडे खूप मोठा कॅरम-बोर्ड होता, ते स्वतः आमच्याबरोबर खेळायला बसायचे. पत्त्यांची जादू करून दाखवायचे. काका बासरी सुद्धा उत्तम वाजवायचे. त्यांच्यामध्ये खूप कला होत्या. त्यांनीच मला 'बुलबुल' वाजवायला शिकवलं. त्यांनी वाजवायला शिकवलेलं पहिलं गाणं म्हणजे "मेरा जुता है जापानी", अजूनही मला जसच्या तसं वाजवायला येतं. मावशी सुद्धा आमचे खूप लाड करायची. बेकरीमधून सकाळ-सकाळी जाउन सगळ्यांसाठी ताजे, गरमगरम ब्रेड घेऊन यायची, आवडीचा भाजीपाला, आवडीची लोणची-चटण्या, आमरस, आम्ही येणार म्हणून रस्ना तयार करून बाटल्या भरून ठेवलेल्या असायच्या. दोघेही खूप खूप लाड करायचे आम्हा सगळ्या मावस बहिण-भावंडांचा.

      आई आणि सगळ्या मावश्या भेटल्या कि त्यांचीही खरेदी अगदी जोमात चालायची. सांगलीला त्याकाळीपासून पु. ना. गाडगीळ ची पेढी प्रसिद्ध आहे. त्यानिमित्ताने मग सांगलीला सगळ्यांचं जाणं होई. तिथून जवळच गणपतीचं मंदिर आहे. काका आम्हाला तिकडे घेऊन जात. कृष्णा नदीकाठीचं हे मंदिर पटवर्धन संस्थानाच्या काळातलं. खूप सुरेख आणि छान आहे. आम्ही तासंतास तिथे खेळलोय लहानपणी. कृष्णेकाठी सुद्धा पाण्यात आम्हाला नेऊन आणायचे काका. पाण्यात खेळायची आम्हाला भारी हौस.

      नरसोबाची (नृसिंह) वाडी, मिरजेवरून तशी जवळच पडते. तिकडेही मग आमचं जाणं असे. जाताना डाळ-कांदा, वेग-वेगळ्या चटण्या, चपाती, दहीभात हे घरचं जेवण आम्ही बांधून घेऊन जात असू. तिकडे गेलं कि पाण्यात पाय धुण्याची आमची घाई असें. तिथल्या खेळण्यांच्या दुकानातून काका आम्हाला हवं ते घेऊन देत असत.

      मध्येच मग चार दिवस आम्ही सगळे मामाच्या गावाला जात असू. अगदी लहानपणीच्या "झुकझुक झुकझुक आगीन गाडी." गाण्यातल्या प्रमाणे आमच्या मामाचा वाडा खूप मोठा आणि चिरेबंदी. तिकडेही मामा कधी-कधी गाडीवर बसवून शेताला घेऊन जात असत. हिरवीगार आणि खूप मोठी उसाची शेती, जुन्या काळातल्या दगडी बांधकामाच्या विहिरी, त्यात तुडुंब भरलेलं पाणी. कधी मामाच्या ट्र˘क्टर मध्ये बसायचो, तर कधी ट्रक मध्ये. ट्रक मध्ये बसलो कि सारखं हॉर्न वाजवायचो आणि ट्रकचा ड्राईव्हर आला कि आम्ही पळून जायचो. ह्या सगळ्या गोष्टी करायला छान वाटायचं तेव्हा. वाड्यात मग लपा-छपी, ब्याट-बॉल, विष-अमृत असे खेळ खेळायचो. आज्जी आम्हाला तिच्या काळातल्या गोष्टी सांगायची. तीही खूप लाड करायची. दोन्ही माम्याही खूप लाड करत. मामीच्या हातच्या जेवणाची सर आजही कुठे नाही. आग्रहाने वाढलेलं जेवण, प्रेमाने केलेली विचारपूस, मामाच्या गावावरून पुन्हा परतताना हातावर दिलेली साखर, त्या गावातून सुटणारी पहाटेची पहिली एसटी बस, त्या रिकाम्या गाडीमध्ये पकडलेली विंडो-सीट आणि गाडी सुटेपर्यंत सर्वांना केलेला टाटा. खरंच, किती अविस्मरणीय क्षण होते ते!

      तिथून निघालं कि मग पुन्हा आष्ट्याला सगळ्यात मोठ्या मावशीकडे थोडा वेळ उतरायचो. ती मावशीही खूप खूप प्रेमळ. आम्ही भावंडं गेलो कि जुन्या पद्धतीने ती मावशी आमच्या डोक्याला तेल लावायची. त्यांच्या घरासमोरच्या गोठ्यात जनावरे बांधलेली असायची. आम्ही मग गायी-बैलांच्या हालचाली बघत, मधेच घाबरत बसायचो… खूप खूप मायाळू काका-मावशी तेही. आम्ही सगळे गेलो कि त्यांना खूप आनंद होई.

      मिरजेला परतताना मन थोडं नाराज झालेलं असे. कारण सुट्टी संपत आलेली असायची. आणि सगळ्यांच्या पुन्हा गावी जाण्याच्या चर्चा सुरु झालेल्या असायच्या. मिरजेवरून पुन्हा गावी जाताना नेण्यासाठी काकांनी आंब्याची करंडी आणलेली असे. सामानाची बांधाबांध करताना काका-मावशी पुन्हा पुन्हा सुट्टीला येण्यासाठी सांगत असत. आणि बघता बघता मग पुन्हा गावी येण्याचा तो नकोसा वाटणारा क्षण पुढे येउन ठेपत असे.

      काका-मावशी अगदी गाडी सुटेपर्यंत आमच्या सर्वांकडे खूप प्रेमाने आणि ओढीने पाहत असत. आम्ही निघताना त्यांचे केविलवाणे झालेले चेहरे फक्त डोळ्यांनी पाहिलेले आठवतंय. पण त्यातला भाव आज कळतोय. त्यांचे डोळे भरून आलेले चेहरे आठवले कि त्यामधली आर्तता आणि जिव्हाळा आता जाणवतो, आज ते क्षण डोळ्यापुढे आले कि डोळे भरवून जातात. स्वतःचं मूल-बाळ नसलेल्या आमच्या काका-मावशींना, महिनाभर त्यांच्यात राहून परत आम्हाला पाठवताना किती मोठं दुःख होत असेल हे आज जाणवतंय. आमच्या बरोबरच्या आठवणी घेऊन ते दोघे वर्षभर पुन्हा आम्हाला उन्हाळ्याची सुट्टी कधी लागतेय याची वाट का पहायचे हे आज कळतंय. ते दोघे असूनही एकटे का होते हे आज कळतंय. आम्हाला सोडून पुन्हा स्वतःच्या घरात गेल्यावर रिकामं रिकामं घर पाहून, त्यांच्या मनाची काय अवस्था होत असेल याचा नुसता विचार केला तरी डोळ्यातून पाणी येऊ लागतं. ते प्रेम, तो जिव्हाळा, ती ओढ - आपुलकी, काळजी आणि ही नाती…..

     मिरजेवरून परतताना, आठवणींचं गाठोडं बांधून त्याचं भांडवल करून पुढच्या शैक्षणिक वर्षभरासाठी असं आम्ही दर वर्षी गावी परतत असू.

           आईस्क्रीम, आंबे, भेळ, गाडीवरचा प्रवास, बागेतले खेळ….. गोष्टी खूप साध्या साध्या आहेत! यातल्या कोणत्याही गोष्टी आज मी विकत घेऊ शकतो, खाऊ-पीऊ शकतो, फिरू शकतो. पण बालपणीच्या ह्या लाख मोलाच्या आठवणी, आज हिरे-माणकं विकली तरी मी परत नाही मिळवू शकत. सगळे मावस भाऊ-बहिणी आम्ही एकत्र जमून घालवलेली उन्हाळ्याची सुट्टी, बरोबर खेळलेले पत्त्यांचे डाव, एका ताटात जेवलेला गोडवा, मावशीने लाडाने चारवलेले घास, एखाद्या आवडत्या वस्तू साठी आईकडे केलेला अट्टाहास, मग लाडक्या मावशीने गुपचूप ती घेऊन दिलेली वस्तू, बागेत एकत्र खेळलेले क्षण, कृष्णेकाठी एकमेकांच्या अंगावर उडवलेलं पाणी, काका-मावशींचं अतूट प्रेम, त्यांनी आमचे केलेले लाड, बहिण-भावांचा एकमेकाबद्दल जिव्हाळा, एकमेकांबद्दलचं प्रेम ह्या सगळ्या आठवणी आयुष्यभर विसरता येण्यासारख्या आहेत. आज ते बालपणीचे दिवस आठवले कि अगदी कटाक्षाने जाणवतं कि आज ते प्रेम, तो जिव्हाळा, ती आर्तता आणि तो नात्यांमधला गोडवा मागे सोडून आपण खूप-खूप पुढे निघून आलोय. टेन्कोलोजी मुळे आपण पैसा तर खूप मिळवू शकतो, पण लाख मोलाच्या ज्या गोष्टी आपण हरवून बसलोय ते कोणाला आठवून किंवा समझून घ्यायची ईच्छाही नाहीये. आजची पिढी कोण-कोणत्या गोष्टींना मुकलीये हे त्यांना कधीही कळणार नाही.

          अचानक येणारं पत्र हातात पडल्यावरचा आनंद, ते वाचताना डोळ्यात उमटणारे भाव, आणि मध्येच उभी राहणारी आसवं. शाळेतून घरी आल्यावर समोर मामा घरी आलेला पाहून झालेला आनंद, शेतामध्ये घरचं जेवण बांधून नेऊन केलेलं वनभोजन, विना चप्पल रानोरानी बांधावरून चाललेल्या वाटा, विहिरीत पोहण्याचा आनंद, बागेत शिवा-शिवी आणि विष-अमृत खेळताना आवडत्या माणसाला दिलेलं अमृत, पत्ते-कॅरम चे सगळ्या मावस बहिण-भावांसोबत खेळलेले डाव, त्यांच्यासोबत एका ताटात जेवलेलं जेवण, पाहुणे गावाला जाताना हातावर गोड साखर देण्याची पद्धत, गाडी सुटेपर्यंत आणि एकमेकांना दिसेनासं होईपर्यंत केलेला टाटा आणि पुन्हा लवकर भेट होणार नाही म्हणून त्याच वेळी डोळ्यात तरळणारी आसवं ….. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप सुखद दुःखं होती. आज ह्या सगळ्या गोष्टी आठवल्या कि मन हेलावून जातं. पुन्हा पुन्हा बालपण जगावं असं वाटतं.  

         देवा, देशील का रे ते बालपण मला पुन्हा??????

मला पुन्हा एकदा काका-मावशींच्या गावाला जायचंय आणि त्यांच्या प्रेमाची परतफेड करायचीये. मला पुन्हा एकदा मामाच्या गावाला जायचंय आणि पुन्हा तेच बालपणीचे क्षण अनुभवायचेत. मला पुन्हा एकदा सगळ्या भावंडांच्या ताटात एकत्र जेवायचंय आणि पुन्हा तेच गोड भांडण करायचंय. मला पुन्हा कृष्णेकाठी जायचंय आणि पाण्यात पाय सोडून तासंतास बसायचंय, मला पुन्हा पत्राची आतुरतेने वाट पहायचीये आणि ते वाचताना डोळ्यात आसवं आणायचीयेत, मला पुन्हा शाळेत जाताना पावसात चिंब भिजायचंय आणि पहिल्या पावसाचा - मातीचा सुगंध घ्यायचाय, मला पुन्हा रानोवनी अनवाणी भटकायचंय आणि घरी आल्यावर तोच आई-आप्पांचा ओरडा खायचाय, मला पुन्हा शाळेच्या ग्राउंड वर खो-खो, कबड्डी आणि सूर-पाट्या खेळायच्यात आणि गुडघ्यांना दुखापत करून घ्यायचीये, मला पुन्हा सगळं बालपण अनुभवायचंय आणि यावेळी ते पुन्हा मनात साठवायचंय.

       दे ना रे देवा….. प्लीज….!!!!!
  




लेख लिहिलेली:
तारीख: २३/११/२०१३
स्थळ:   कात्रज, पुणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा