मंगळवार, २१ जानेवारी, २०१४

आप्पा





ति. स्व. आप्पा,
          चि. पनूचा शि. सा. नमस्कार

    आप्पा, कालच पुण्याला परत आलो. तुम्हाला आणायला इथून गाडी घेऊन आलेलो पण तुमच्याशिवाय आयुष्यभरासाठी या वेळी आम्ही एकटेच परतलो, भरलेल्या मनाने आणि जड अंतःकरणाने….  गाडीतून येताना यावेळी तुमच्या पुढच्या सीटवर तुम्ही नव्हता आणि तुमच्या आठवणीत तिथूनच एकटेपणाचा प्रवास सुरु झाला….  ओल्या पापण्यांनी.…  या वेळी "पनू सावकाश जाऊ दे" म्हणायला तुम्ही नव्हतात. तेव्हाच ठरवलं  मनाशी कि आता संसाराची गाडी हाकताना सुद्धा आपली आणि आपल्या मागे बसलेल्या कुटुंबाची काळजी आता आपल्यालाच घ्यायचीये.… सगळ्या रस्त्याने गाडी चालवताना आपण खूप मोठं काहीतरी गमावून परततोय हि खंत आणि हा विचार सारखा मनाला सैर-भैर करून सोडत होता

          पुण्यात पोहोचून घरात पाऊल ठेवलं, तुमच्या आराम-खुर्ची कडं लक्ष गेलं आणि डोळ्यात टचकन पाणी आलं. आणि तिथून पुढं प्रत्येक गोष्टीला तुमची आठवण येत राहिली. आपल्यावर आता लक्ष कोण ठेवणार? आपली विचारपूस कोण करणार? एखादा निर्णय घेताना मी आता कोणाला विचारणार? आयुष्यात कोणतीच गोष्ट मी तुम्हाला विचारल्याश्वाय केली नाही हो! सगळ्या छोट्या-मोठ्या गोष्टी मी तुमच्या शब्दावर करत आलो. तुम्हीच माझे वडील होता आणि तुम्हीच मित्र सुद्धा. अलीकडच्या - महिन्यात इकडे आणल्यापासून तुम्ही माझ्याशी मनमोकळेपणाने बोलायचात. खूप साऱ्या जुन्या आठवणी, जुन्या गोष्टी सांगायचात, मन भरून बोलायचात. आणि मागच्या - महिन्यात तर बऱ्याचशा जुन्या गोष्टी तुम्ही गप्पा मारताना सांगितलेल्यात.  

     खरं तर नानाचं मेडिकल-दुकान इकडे पुण्यात सुरु केल्यावर, पिंपोडला तुम्ही दोघेच होतात आणि पाण्याच्या अभावाने होणारे हाल, त्यात तुमची गुडघेदुखी हे मला पाहवत नव्हतं म्हणून इकडे पुण्याला घेऊन आलेलो तुम्हाला. आयुष्यभर व्यवसायामुळे तुम्ही लोकांत मिळून-मिसळून राहिलेलात आणि इकडे आल्यावर तुमच्या मनाची होणारी कोंडी मला थोडीफार जाणवत होती. म्हणून मी, तुम्ही कुठे जाउन येतो म्हणालात तरी कधी नाही म्हणत नसे. तुमचं मन जिथे आणि ज्यामध्ये रमेल ते करू देत असे. पण या वेळी तुम्ही कोयनेला म्हणून गेलात ते परत आलाच नाहीत.

          देवा, कसलंहो हे heart attack चं दुखणं? क्षणभराची उसंत सुद्धा देता एखाद्या माणसाला पटकन हिरावून घेऊन जाता. दिवसभर किती उत्साहाने गप्पा मारल्या, फिरलात, सईबरोबर गाडीतून जाता-येताना चेष्टा-मस्करी केली. एकदा जरी मला बोलला असतात कि काही त्रास होतोय तर मी वाऱ्याच्या वेगाने तुम्हाला कोणत्याही हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो असतो. अगदी काहीही केलं असतं तुमच्यासाठी

     तुम्हाला रात्रीचा अचानक त्रास सुरु झाल्यापासून ते प्राण सोडेपर्यंतचा प्रत्येक क्षण आठवला तरी नको-नको वाटतं. सारखं मनाला असं वाटतंय कि अजून थोडी वेगात चालवली असती गाडी तर - गाडीतून त्यांना उतरवल्यावर चालवत नेता उचलून नेलं असतं तर - डॉक्टरने चेकिंग करण्याआधी पटकन जिभेखाली ठेवायला sorbitrate tablet दिली असती तर - देवाने अजून -१० सेकंद दिले असते तर?? पण वेळ कशी क्षणार्धात घाला घालते हे प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिलं. मी स्वतः तुमच्याबरोबर असून काही करू शकलो नाही, हि खंत कायम मनात राहील.

     तुमच्याबरोबरचे, आम्हा भावंडांच्या लहानपणापासूनचे सगळे क्षण सारखे डोळ्यापुढे आता गर्दी करतात. आईच्या नोकरीमुळे तुम्हाला कधी-कधी आमची आई सुद्धा होऊ लागायचं. माझं तर बऱ्यापैकी बालपण तुमच्या सानिध्यात आपल्या कापड-दुकानातच गेलंय. लहानपणापासून शिक्षण, संस्कार, इतरांबद्दल आदर, दुकान-दारी, व्यवहार-ज्ञान, देवाबद्दल श्रद्धा, आलेल्यांचा पाहूणचार ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यापासूनच शिकलो. तुमच्याबरोबर एका ताटात जेवलेले जेवणाचे घास, तुमच्या खाऊच्या पानातला एक घास, तुम्ही सायकलवरून पुढच्या नळीवर बसवून करून आणलेली रपेट, तुमच्या मागे बसून आपल्या कायनेटिक होंडा वरून पुसेगावला यात्रेला जायचो तेव्हा तुमच्या पोटाला मी मिठी मारून बसायचो ते क्षण, दुकानच्या खरेदीला गेल्यावर माझ्यासाठी खूप साऱ्या चॉकलेट्स चे तुम्ही आणलेले पुडे, अर्धा पोतं भरून खेळणी तुम्ही आणून दिलेलीत, पण तरीही तुम्ही कुठे गावाला जाऊन आल्यावर मला काहीतरी खेळणं आणावत असं वाटे आणि आल्या-आल्या मी तुमची ब्याग चेक करत असे; आणि तुम्ही म्हणायचात कि खेळण्यांचा ट्रक चिखलात अडकलाय, पुढच्या वेळी नक्की आणू. तेव्हा वाईट वाटायचं, पण जेव्हा कळू लागलं तेव्हा मात्र ते आठवून हसू यायचं. आई सारखी अभ्यासाला बसवायची आणि तुम्ही मात्र खेळायला सोडायचात. पंढरपूरला गेल्यावर नाना-दिदी मोठे असल्याने चालायचे, पण मला मात्र तुम्ही खांद्यावर उचलून घ्यायचात, माझे सगळे हट्ट पुरवायचात. आवडीचं घड्याळ, आवडीचा बूट, चांगले कपडे अगदी जे-जे हवं ते सगळं दिलत. कधीच कोणत्या गोष्टीला नाही म्हणाला नाहीत. पण स्वतः मात्र साधे कपडे घालत राहिलात. इंजिनीयरिंग ला घराबाहेर पडलो तेव्हा तुम्ही मला एकदाच सांगितलेलत कि "रोजचा रोज खर्च लिहायची सवय ठेव, म्हणजे आपलं आपल्याला कळतं कि आपण कुठे योग्य पैसे खर्च करतोय", तेव्हापासून ते आज-पर्यंत मी ती सवय अंगी लावून घेतलीये. पण तेव्हापासून तुम्ही मला आज-तागायत विचारलं नाहीत कि मी दिलेले पैसे कुठे आणि कसे खर्च केले ते. पण त्या सवयीमुळे मी कधीच निष्फळ खर्च केला नाही…. निव्वळ तुमच्या आणि आईच्या चांगल्या संस्कारांमुळेच.

     आयुष्यभर तुम्ही खूप साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि त्या पार पाडण्यातच तुमचं बालपण, तारुण्य, वैवाहिक जीवन आणि सगळं आयुष्य खर्च झालं. एक मुलगा म्हणून, एक नवरा म्हणून, एक वडील म्हणून, एक चुलते म्हणून, एक मामा म्हणून, एक पुतण्या म्हणून, एक मित्र म्हणून आणि अगदी एक आजोबा म्हणून सुद्धा तुम्ही सगळ्याच जागा अगदी १००% भरून काढल्या. कधीही कोणाला कमी केलं नाहीत. कोणी केलेल्या उपकारांची जाणीव नाही ठेवली तरी तुम्ही कधीही अपेक्षा सुद्धा केली नाहीत अशा लोकांकडून…. नेहमी सांगितलत आम्हाला कि, "आपण आपलं कर्तव्य करत राहायचं. पुढे मुलांना मोठं झाल्यावर वाटू नये कि ह्यांच्याकडे पैसा होता पण आम्हाला शिकवलं नाही किंवा आमची लग्न नीट पार पाडली नाहीत…. त्यांचं त्यांच्याबरोबर". खरंच तुम्ही खूप साऱ्या लोकांना त्यांच्या पायावर उभे राहातोपर्यंत मदत केलीत आणि योग्य दिशा - योग्य मार्ग दाखवलात. अगदी निःस्वार्थी पणे कर्तव्ये पार पाडलीत. कधी कोणाकडून पाच पैशांचीही अपेक्षा केली नाहीत. कधी लोण्यासारखे मऊ, तर प्रसंगी वज्राहूनही कठीण. कधी खूप सारं प्रेम-जिव्हाळा, तर वेळ पडल्यावर तेवढाच रागही

          ज्या काळात तुम्ही शिक्षण घेत होता आणि तुम्हाला घरातून पाठबळ हवं होतं त्या काळात तुम्हाला जबाबदाऱ्या आणि निराशा पदरी आली. दादा आणि काकांनी येवढ्या कष्टाने उभा केलेला कापड व्यवसाय कायम रहावा म्हणून दादांनी तुम्हाला वेळा शिक्षकाची नोकरी सोडायला लावली. पण तरीही तुम्ही पुन्हा ती मिळवलीत. एवढं होऊन सुद्धा शेवटी दादा सुद्धा व्यवसाय टिकावा म्हणून विनंती करू लागले कि, "बाळा, आता तू लक्ष नाही घातलंस तर आपला पिढीजात व्यवसाय बंद पडेल", तेव्हा मात्र तुम्ही कायमची नोकरी सोडून दिलीत आणि आपला पिढीजात व्यवसाय सावरलात. राम-मंदिरातला उत्सव, पंढरीची वारी, घरदार, शेती, मुलांची शिक्षणं, येण्या-जाणाऱ्यांचा मान-पान आणि पाहूणचार अगदी सारं काही १००% पार पाडलंत. पण कधीच कोणत्या गोष्टीची तक्रार केली नाही आणि कधीच हार मानली नाहीत. प्रत्येक गोष्टीत घराण्याच्या मर्यादा राखल्या. आई आणि तुम्ही आमच्यासाठी खूप सारं वैभव उभं केलंयत, अगदी स्वकष्टाने. स्वतः मात्र दोघेही कायम साधेच राहिलात. स्वतःसाठी कधीही कोणत्या गोष्टीची हौस-मौज केली नाहीत. पण ते उपभोगण्याची जेव्हा आता वेळ होती तेव्हा तुम्ही आमच्यातून निघून गेलात.

          देवा पांडुरंगा, जेव्हापासून आप्पांवर घराण्याची सुरु असलेली पंढरीची वारी करण्याची जबाबदारी आली, तेव्हापासून त्यांनी कधीही त्यात खंड पडू दिला नाही. रात्रीचा दिवस करून, व्यवसाय, कुटुंब आणि सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी वारी निरंतर सुरु ठेवली. आणि मार्गशीर्ष शु. एकादशीची त्यांची अगदी शेवटची वारी तर तुम्ही साक्षात्कार दिल्यासारखा त्यांच्याकडून परिपूर्ण करून घेतलीत. मठातल्या वारकऱ्यांना लाडूचं जेवण काय नि चहापान काय! आणि लगेच पंधरवड्याच्या कृ. एकादशीला आप्पांना वैकुंठाला बोलावून घेतलंत. खूप सारे लोकं बोलत होते कि दादांची वारी अखंड सुरु ठेवल्याचं हे पुण्य आप्पांना मिळालंय, असं मरण यायला खूप भाग्य आणि पूण्य कमवायला लागतं. पण देवा, येवढ्या लवकर? अजून तर त्यांच्या नातवांनी आजोबांची सेवा करण्याचं सुद्धा राहून गेलंय. अजून एकाही नातवाचं लग्न त्यांनी पहायचं राहून गेलंय. आत्ता तर कुठं त्याचं निवृत्ती जीवन सुरु झालेलं. आत्ता तर कुठे त्यांनी विश्रांती घ्यायला सुरुवात केलेली.

          मागच्या वर्षी असाच एकदा पिंपोडला आलेलो आणि गुडघ्याच्या दुखण्याने तुमचं चालणंच बदलून गेलेलं पाहिलं. ते पाहून मी खूप हिरमुसलेलो. तेव्हाच ठरवलेलं कि आता बास! सगळ्यांना पुण्यात घेऊन यायचं आणि तुम्हाला धड-धाकट बनवायचं आणि ठरवल्याप्रमाणं सगळं सुरु केलेलंही. दहावीनंतर जसा घराबाहेर पडलो तसं शिक्षण, नोकरी निमित्ताने मी कायम बाहेरच रहिलो. आत्ता कुठे सहा महिन्यात तुम्हा सगळ्यांचा सहवास मिळालेला…. अगदी १८-१९ वर्षांनी. खरंच, खूप आनंदात होतो मी तर. ऑफिसवरून आल्यावर तुमच्याशी आणि आईशी थोडा वेळ गप्पा मारल्या तरी दिवसभराचा थकवा निघून जायचा. वर्षे मुंबई ला काढली तेव्हा मला तुम्हा सगळ्यांची काळजी वाटायची. तुम्ही तिकडे पिंपोडला, पाण्यासाठी जीवाचे हाल, त्यात तब्येतीचे हाल. आणि इकडे पुण्यात ह्या दोघी आणि बाकीचे चिमुरडे. नंतर मलाही इकडे पुण्यात नोकरी मिळाली आणि तुम्हा दोघांनाही मग मी इकडे घेऊन आलो. तेव्हापासून मी निर्धास्त असायचो. मन अगदी स्वाभिमानाने फुलून जायचं, कारण आता घरात 'आप्पा' आहेत. आज आपलं 'घर'सुद्धा पोरकं झालंय हो!

     सगळ्यात सुरुवातीला, मी मुंबईला होतो नोकरीला. पण तरीही फोनवर सगळं ठरवून दिदी, नाना आणि मीआम्ही सगळा प्लान करून किती आनंदानं तुमची एकसष्ठी साजरी केली होती. आणि नंतर आईची सुद्धा केली. येवढ्या थोर आई-वडीलांपोटी आम्ही जन्माला आलो याचा आम्हा भावंडांना कायम अभिमान होता आणि राहील. या वेळी तर तुमची पंचाहत्तरी अगदी मोठ्या थाटामाटात साजरी करायची ठरवलेली मी. खूप सारे प्लान करून ठेवलेले मनामध्ये आणि आता तर आपण सगळे एकत्र होतो. तुमच्या सगळ्या मित्रांना, आपल्या सगळ्या नातेवाईकांना बोलावून त्यांचाही मान-पान करून आदरार्तिथ्य करायचं ठरवलेलं मी. पण तुम्ही त्या आधीच आमच्यातून निघून गेलात हो

     आम्हा सगळ्यांच्या हृदयामध्ये तुमची झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही. इथून पुढच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला तुमची कमतरता भासत राहील. तुमच्या फोटोला नमस्कार करून एकच मागणं मागत असतो कि, "देवा, मला आप्पांसारखं बनव आणि सगळ्या कुटूंबाला कायम एकत्र बांधून ठेवण्याची शक्ती दे". मला तुमची जागा भरून काढायचिये. आईची काळजी घ्यायचिये, मुलांना मोठं करून उच्च शिक्षण द्यायचंय. घरात तसं पाहिलं तर मी सगळ्यात लहान, पण खूप मोठी जबाबदारी पडल्याची जाणीव क्षण-क्षणाला मनाला भेडसावते. आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या क्षणाला आम्हा सर्वांना तुमची कमतरता भासणारे, कसे करू सगळे सण-समारंभ, कार्यक्रम इथून पुढं साजरे हो?

          लहानपणी, काही चुकल्यावर - हट्ट केल्यावर तुम्ही कानाखाली एक झपाटा द्यायचात, रागवायचात. पण आज, काही चुकल्यावर आम्हाला कोण रागावणार? तो झपाटा अगदी आनंदाने खायची माझी आत्ताही तयारी आहे हो, याल का तुम्ही परत

          तुम्ही कोयनेला जाताना आईला खूप वेळा म्हणू वाटत होतं कि तिकडे थंडी खूप असेल, जाताना घरात घालायला स्लीपर तरी घेऊन जावा म्हणून. पण पाहुण्यांच्या घरी चाललेत, कसं विचारू म्हणून तिने मनातच ठेवलंय. शेवटच्या क्षणाला आईला तुमच्याजवळ हवं होतं हो…. आईला तर तुमची अजूनही साथ हवी होती हो, याल का तुम्ही परत

          नानाशी फोनवर शेवटचं बोललात तेव्हा तुमचा थरथरता आवाज ऐकून त्यालाही घाबरायला झालेलं, त्यालाही आता प्रश्न पडलाय कि घरात आल्यावर, "आप्पा, औषध-गोळ्या घेतल्या का रोजच्या" असं आता कोणाला विचारू? वडिलांचं छत्र हरवल्याची खूप मोठी जाणीव त्यालाही झालीये. तुमची खूप सारी काळजी त्यालाही घ्यायचीये हो, याल का तुम्ही परत?

          दिदीला तर तुमची सेवा करण्याची अखंड इच्छा मनातच राहून गेली. एवढ्या कमी वयात संसारात पडलेली, आयुष्यभर कष्ट आणि तडजोड, तिला तर कायम वाटायचं कि आप्पांनी निवांत महिनाभर तिच्याकडं राहायला यावं आणि तिला वडिलांचं प्रेम मिळावं. कष्टाच्या आणि धावपळीच्या संसारातून वेळ काढून तुमची सेवा करण्याची दिदी-भाऊजींची अजूनही तयारी आहे हो, याल का तुम्ही परत?

          दोन्ही सुना लग्न होऊन आपल्या घरी आल्या तेव्हापासून त्यांना वडील म्हणून तुम्हीच प्रेम दिलं, आप्पा आपले सासरे आहेत हि जाणीव कधीच तुम्ही त्यांना होऊ दिली नाही. मोकळं मोकळं घर पाहून त्यांनाही आता एकटेपणाची जाणीव होते. त्या आता कोणाला हाक मारणार? कि "आप्पा, गरम भाकरी भाजलीये, जेवायला बसा या, ताट वाढलंय". त्यांनाही तुम्ही अजून घरात हवे आहात हो, याल का तुम्ही परत?

          सोनू - श्रेयस सुद्धा खूप-खूप रडले हो. लहानपणापासून तुम्हाला त्या दोघांचा खूप लळा होता. पिंपोड वरून आप्पा आलेत म्हणलं कि पोरं मजले उतरून खाली पळत यायचीत आणि हातातल्या पिशव्या वर न्यायचीत. आज ती नातवंड, तुम्हाला गुडघ्यानं चढायला होणार नाही म्हणून आप्पांना सुद्धा मजले उचलून नेऊ म्हणतायत हो, याल का तुम्ही परत?

          ज्ञानेश्वरी - श्री - संस्कृती हि तुमची नातवंड आज पोरकी झालीयेत. आजोबांची सेवा करण्याचं पुण्य ज्ञानेश्वरीला थोडं तरी मिळालं. पण श्री आणि संस्कृती अजून खूप लहान आहेत हो. त्यांना तर आजोबांच्या बरोबर जास्त काळ सुद्धा लाभला नाही. फक्त महिने झालेले तुमचा सहवास मिळून त्यांना. श्री आणि संस्कृतीला बोलतं करण्यासाठी तुम्ही त्यांना चेष्टेने चिडवायचा आणि मुलं सुद्धा चिडता त्यात रमून जायची. संस्कृतीला विचारलं "आप्पा, कुठं गेले गं?" तर पंढरपूरला गेलेत म्हणते. नातवंड सुद्धा तुमची वाट पाहतायत हो, याल का तुम्ही परत?

          अगदी अचानक आम्हा सगळ्यांना पोरकं करून असे का सोडून गेलात हो? आप्पा, खूप आर्ततेने आम्ही सगळेजण वाट पाहतोय तुमची. Please, please या ना हो परत.
                          
                                               तुमचाच लाडका, 
                                                    पनू 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा